निःस्वार्थ भक्त निघालाय 'शेतकऱ्यांच्या विठ्ठला'च्या दर्शनाला...

भारतातील प्रमुख पाच व्यक्तींमध्ये पवार साहेबांचे स्थान आहे. जागतिक पातळीवर देखील त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या मातीला लाभले आहे. महाराष्ट्राने पवार साहेबांच्या सोबत भक्कमपणे उभे राहावे व नवा इतिहास घडवावा, असा आशावाद संजय खंदार बाळगून आहेत.
Sharad Pawar - Sanjay Khandar
Sharad Pawar - Sanjay Khandar

आर्णी (जि,यवतमाळ) ः शरद पवारांचे विचार आणि कर्तृत्वाने भारावलेला तालुक्यातील जवळ्याचा बावन्न वर्षीय शेतकरी संजय राणाप्रताप खंदार हे जवळा ते बारामती असा ५५० किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत. पवारांनी आयुष्यभर केलेल्या कार्याप्रति त्यांच्या वाढदिवशी १२ डिसेंबरला बारामतीला पोहोचून ते कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती आस्थेने समजून घेण्याची व त्यावर उपाययोजना सुचविण्याची धमक पवार साहेबांमध्येच आहे. त्यामुळे ते पवारांना ‘शेतकऱ्यांचा विठ्ठल’ म्हणतात.
 
विदर्भातील कापूस पिकाचे यावर्षी गुलाबी बोंडअळीमुळे झालेले नुकसान व परतीच्या पावसाने झालेले सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान, यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाकडे शासनाचे लक्ष पदयात्रेच्या माध्यमातून वेधण्याचा प्रयत्न खंदार करत आहेत. आज सकाळी 10 वाजता जवळा येथून ते निघाले. तब्बल 24 दिवस कडाक्याच्या थंडीत पायी प्रवास करणारा हा शेतकरी म्हणतो, आजवर देशात अनेक कृषिमंत्री होऊन गेले. परंतु देशातील शेतकऱ्यांच्या लक्षात राहिलेले व त्यांच्या मनात आदराचे घर केलेले दोनच कृषिमंत्री ठसठशीतपणे भारताने पाहिले ते म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख व शरद पवार.

ज्यावेळी विदर्भात अतिवृष्टी झाली, अवर्षण झाले त्या-त्या वेळी आदरणीय पवार यवतमाळ जिल्ह्यात आले व अनेक शेतांत जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली होती. ती बिकट परिस्थिती तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या लक्षात आणून देत सर्वात मोठी कर्जमाफी दिली.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात झाला होता. त्यावेळी सत्तेत असणारे कुणीही दखल घेण्यासाठी आले नव्हते. मात्र शरद पवार प्रकृतीची तमा न बाळगता तातडीने आले व नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तेलंगणा अशा मोठ्या राज्यांतील शेतकऱ्यांनीही त्यांच्या कार्याची महती ओळखली. त्यामुळे विविध प्रांतातील शेतकरी त्यांचे फोटो घरातील भिंतीवर लावतात. 

घार फिरे आकाशी लक्ष तिचे पिल्लापाशी. शेतकऱ्यांवरील संकटाच्यावेळी पवारांची मनाची झालेली अवस्था साऱ्या भारतवर्षाने अनेक वेळा अनुभवली. आज बोंडअळीमुळे व परतीच्या पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांवर भयाण संकट ओढवले आहे. ही परिस्थिती आस्थेने समजून घेण्याची व त्यावर उपाययोजना सुचविण्याची धमक पवार साहेबांमध्येच आहे. त्यामुळे ते पवारांना ‘शेतकऱ्यांचा विठ्ठल’ म्हणतात. त्यांच्या कर्मभूमीतील मातीला वंदन करून ही बाब शासनाच्या लक्षात आणून द्यावी व मनोमन केलेल्या संकल्पाची पूर्तता करावी, हाच संजय खंदार या शेतकऱ्याचा या यात्रेमागील हेतू आहे.

अनेक मित्र व नातेवाइकांनी थंडीत न जाण्याचा सल्ला संजय खंदार यांना दिला पण त्यांनी पवार साहेब वयाच्या ७९ व्या वर्षी भर पावसात सभा घेतात, शेतकऱ्यांची व शेतमालाची परिस्थिती समजून घेण्यासाठी धुऱ्या बांधावर जातात. तर मी का जाऊ शकत नाही. माझी आजी कृष्णाबाई लग्न झाल्यापासून वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत पंढरपूरला पायी गेली. मग मी आमच्या शेतकऱ्यांच्या विठ्ठलाच्या भेटीला एकदा जाऊन माझा संकल्प पूर्ण का करू नये? असा प्रश्न त्यांनी केला. शिवरायांच्या रायगडाला जाऊन माथा टेकवताना जो आनंद होतो व समाधान लाभते. तोच आनंद बारामतीला व काटेवाडीच्या मातीला माथा टेकवून मला होईल. ती धन्यता मिळविणे यापेक्षा मला आयुष्यात दुसरे समाधान नाही. आणी संकल्पपूर्तीने कमावलेली ही  संपत्ती मला आयुष्यभर पुरेल, असा विश्वास संजय खंदार यांनी व्यक्त केला.

भारतातील प्रमुख पाच व्यक्तींमध्ये पवार साहेबांचे स्थान आहे. जागतिक पातळीवर देखील त्यांनी आपली खास ओळख  निर्माण केली आहे. असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या मातीला लाभले आहे. महाराष्ट्राने पवार साहेबांच्या सोबत भक्कमपणे उभे राहावे व नवा इतिहास घडवावा, असा आशावाद संजय खंदार बाळगून आहेत. बारामती त्यांच्या अथक परिश्रमाची व अथांग कार्यकर्तृत्वाची साक्ष देते. अशा अजरामर झालेल्या बारामतीच्या  पवित्र मातीला माथा टेकविण्याचा संजय खंदार या बहाद्दर शेतकऱ्याचा धेय्यवेडा संकल्प निश्‍चितच ऐतिहासिक असा आहे.
 
संजय खंदार यांचा जवळा ते बारामती पदयात्रा मार्ग
गुरुवार ता, १९ नोव्हेंबर ते शनिवार दिनांक १२ डिसेंबर २०२० (२४ दिवस)
जवळा - आर्णी - महागाव - तुपटाकळी - दिग्रस - ईसापूर - धुंदी - पुसद - सांडवा - शेंबाळपिंप्री - माळेगाव - कळमनुरी - उमरा - हिंगोली - हिवरा - औंढा नागनाथ - माथा - चांदणी - पाचेगाव - बोरी - शिव मल्हार चौक - पाथरी - माजलगाव - बीड - पाटोदा - जामखेड - भिगवण - काटेवाडी - बारामती (गोविंदबाग)
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com