यवतमाळ : कोरोनाने माणसाला जगणे शिकवले, आपल्या गरजा किती मर्यादित आहेत, हे शिकवले. कोरोनाच्या लढ्यात मानवतेचा परिचय देणाऱ्या बऱ्याच घटना घडत आहेत. पण माणुसकीला लाजवणाऱ्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात घडली. कोरोनाने मरण पावलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांनी १५ तास तसाच ठेवला, पण त्याच्यावर अंत्यसंस्कार केले नाही.
पुसद येथे चौकीदारीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नंतर त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह तसाच राहू दिला. १५ तास उलटुनही त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली नाही. ही बाब तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांना माहिती होताच. त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः या व्यक्तीच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला.
तहसीलदार वाहुरवाघ यांनी केलेल्या या कामामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी मृतदेहाकडे पाठ फिरविल्यावरही त्यांनी अंत्यसंस्कार करुन पुत्रकर्तव्य पार पाडले, असे सर्व लोक बोलत आहेत. हा मृत व्यक्ती खासगी चौकीदारी करून चरितार्थ चालवीत होता. त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने कोरोनाची चाचणी करून घेतली. तपासणीचा अहवाल येईपर्यंत सदर व्यक्ती गृहविलगीकरणातच होता. ज्या दिवशी तपासणी केली, त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हे माहिती झाल्यावर कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाकडे फिरकूनही पाहिले नाही किंवा इतर कुणाला कळविण्याचेही सौजन्य दाखविले नाही.
हा प्रकार तहसीलदार वाहुरवाघ यांना माहिती होताच, त्यांनी पुढाकार घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मानवतेचे मोठे कार्य केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
(Edited By : Atul Mehere)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.