जामखेडचा `तो` पॅटर्न गेला कुठे, पुन्हा कोरोना शिरकाव धोकादायक

जामखेड तालुक्यात सध्यालोणी येथे 2, जवळके येथे 2, मोहरी 1 व जायभायवाडी येथे 1 रुग्ण आहेत.कोरोनामुक्त झालेल्या जामखेडला पुन्हा कोरोनानी शिरकाव केला आहे.
corona test.jpg
corona test.jpg

जामखेड : कोरोनाने त्रस्त झालेला जामखेड तातडीने कोरोनामुक्त होऊ शकला. जामखेड पॅटर्न म्हणून राज्याला आदर्शवत झालेल्या या तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सहा रुग्ण सापडल्याने आता पुन्हा उद्रेक होतो की काय अशी भिती व्यक्त होत आहे.

जामखेड तालुक्यात सध्या लोणी येथे 2, जवळके येथे 2, मोहरी 1 व जायभायवाडी येथे 1 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या जामखेडला पुन्हा कोरोनानी शिरकाव केला असून, निष्काळजीपणा आणि मुंबई-पुण्याहून येणाऱ्या बरोबरच या दोन्ही शहरात जाऊन येणाऱ्या नागरिकांनी कोरोनाचा वानवळा आणला आहे. ग्रामीण भाग बाधित केला आहे. जामखेडच्या प्रशासनाने गेली तीन महिण्यांपासून डोळ्यात तेल घालून काम केले, मात्र आता मात्र हात टेकले आहेत. प्रशासन हातबल झाले आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई - पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांना थेट त्यांच्या मुळ गावी जाऊ न देता जामखेड व खर्डा येथे क्वारंटाईन करण्याचा निर्णय आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी आर्चना नष्टे व जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी घेतला. असा निर्णय घेणारा जामखेड हा राज्यातील पहिला तालुका ठरला. त्यामुळे कोरोनाला तालुक्यात आळा बसला. मात्र शेजारच्या जिल्ह्यात व तालुक्यात सर्व शिथिल आहे, त्याचा परिणाम जामखेडवर झाला असून, लोक प्रशासनाचेही ऐकण्याला तयार नाहीत.
 

ग्रामसुरक्षादल करतेय काय

गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्या सहभागातून गावोगाव आलेल्या चाकरमान्याची माहिती प्रशासनाला देऊन तालुक्यातील खर्डा व जामखेच्या विलगिकरण कक्षापर्यंत पाठविताना मोठ्या आडचणी आणि संघर्ष होत आहे. अनेकजण या समितीला व्यक्तींकडे बघून घेतो, असा दम भरीत आहेत. हे ऐकून समितीच्या कार्यालाच 'दम' लागला आहे.  ही मंडळी तालुक्यात कोणत्याही रस्त्याने आली, तरी त्यांना त्याठिकाणी असलेल्या चेक पोस्टवर आढवून क्वारंटाईन करायला हवे. तसेच स्वतःच्या वहानातून येणाऱ्या व्यक्तींची परिस्थिती बरी आहे, असे लक्षात घेऊन त्यांना क्वारंटाईन 'फी'आकारावी, म्हणजे हे लोंढे थांबतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून होत आहे.

पुन्हा क्वारंटाईन कडक हवे

मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांना थेट त्यांच्या मुळ गावी जाऊ न देता जामखेड व खर्डा येथे क्वारंटाईन करण्याचा निर्णय अधिक कडक आणि काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरण्यास सुरवात केल्याने ग्रामिण भागातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. जनतेनेही आता तरी गांभिर्याने कोरोनामुक्तीसाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा जामखेड तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

चोरून क्लासेस सुरूच

शाळा -महाविद्यालय बंद आहेत. मात्र आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अधिक जागृक झालेल्या पालकांनी व काही शिक्षकांनी चोरुन क्लासेस सुरु केले आहेत. अनेक ठिकाणी गर्दी करतात, मग आम्ही क्लास घेतला म्हणून काय होतय ? असा प्रतिप्रश्न हे बहाद्दर करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com