अकोले : परजिल्ह्यातून आपल्या गावी परतलेल्या चाकरमान्यांनी गावा-गावांत आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सी, सॅनिटायझरचा वापर आदींना फाटा देऊन ही मंडळी आता गावातील पदाधिकाऱ्यांनाच धमकावू लागली आहे. काही महाभागांनी "तू पुढच्या निवडणुकीला सरपंच कसा होतो, ते बघतोच," असेही काही सरपंचांना सुनावले आहे.
आपला गाव कसा, हे कधी न बघणारे, गावची घरे, शेताची लाल की काळी माती ज्यांनी पहिली नाही, याकडे ढुंकूनही न पाहणारी असे तिसऱ्या पिढीतील चाकरमानी कोरोनाची भीती उरात बाळगून "गड्या आपला गाव बरा" म्हणत पायी, दुचाकी, चारचाकी घेऊन आपल्या मुलांबाळासह वाडीवस्तीवर गर्दी करू लागले आहेत.
जिथे जागा मिळेल, त्या ठिकाणी गाड्या लावून घरावरील उडालेले पत्रे पडलेल्या भिंतीवर प्लास्टिक कागद, तर जमिनीवर ताडपत्री टाकून जसे अनेक वर्षे या गावात राहतो, या अविर्भावात वावरून सामाजिक अंतराचे भान नाही, की सॅननेटायझर नाही.
तालुका प्रशासनाने गावातील सरपंच व कोरोना कमेटीला गावात येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करा, त्यांची एका ठिकाणी राहण्याची संस्थात्मक व्यवस्था करा, असे सांगितले असले, तरी येणारे लोक जोशात त्यांना न जुमानता आपल्या घरीच राहत आहेत. जे राहतात, ते आम्हाला सर्व व्यवस्थित पाहिजे, संडास, बाथरूम, सॅनीटायझर,पिण्याचे पाणी उपलब्धतेसाठी दादागिरी करून सरपंच व कमिटी सदस्यांना मारहाण करीत आहे.
पोलीस यंत्रणेकडे मनुष्यबळ नसल्याने ते हतबल होतात. मग दाद कुणाकडे मागायचे म्हणत सरपंच व कमेटीनेही मुंबई, पुणे येथील चाकरमानीपुढे हात टेकले आहेत..आपणाला संरक्षण मिळत नसेल, तर कशाला वादात पडायचे, म्हणत स्थानिक लोक शांत झाल्याने येणारे लोक मनमानी करीत आहे.
कुमशेत, शिरपुंजे, वारूघुशी, एकदारा, जनेवाडी या भागात सरपंचांना मारहाण, शिवीगाळ केल्याने तक्रारीही दाखल झाल्या आहेत. तर काही महाभागांनी "तू पुढच्या निवडणुकीला सरपंच कसा होतो, ते बघतोच," असेही सुनावले आहे. सुरुवातीला अतिशय चोखपणे कामगिरी वाजवणारे प्रशासन नंतर ढील देताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुभाव वाढेल, की अशी शंका उपस्थित होत आहे.
सरपंचांनी काम तरी कसे करावे : पिचड
अकोले तालुक्यात मुंबई, पुणे येथून येणारे लोक, चाकरमानी हे कोरोनाबाधित आहेत कि नाही, हे स्थानिक सरपंच व कमिटीला कसे समजणार, त्यासाठी प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. त्यात सरपंचांना मारहाण झाल्यास प्रशासन पुढे येत नाही, मात्र प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यास ३५३ सारखे गुन्हे दाखल केले जातात, मग सरपंचांना संरक्षण मिळत नसेल, तर सरपंचानी कसे काम करायचे, असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी उपस्थित केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.