बाहेरून येणारे होणार जामखेडमध्ये क्वारंटाईन

नागरिकांना क्वारंटाईनकरण्यासाठी जामखेमधील शाळा,महाविद्यालयाच्या इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या. मात्र याठिकाणी पाण्याची, शौचालयाची व्यवस्था नसल्याने, ते बांधून देण्याची तयारी आमदार रोहित पवारांनी दाखविली.
majur.jpg
majur.jpg

जामखेड : जामखेड कोरोना 'मुक्त' झाले खरे; मात्र यापुढील काळात कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान जामखेडकारांसमोर राहणार आहे. कारण मुंबई - पुण्याहून किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या सर्वांना जामखेडमध्येच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. जामखेडमध्येच क्वारंटाईन करण्याच्या प्रस्तावावर मोठा 'खल' झाला होता, पण अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले.

या नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी जामखेमधील शाळा, महाविद्यालयाच्या इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या. मात्र याठिकाणी पाण्याची, शौचालयाची व्यवस्था नसल्याने, ते बांधून देण्याची तयारी आमदार रोहित पवारांनी दाखविली. तसेच क्वारंटाईन होणाऱ्या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची, नाश्त्याची सोय देखील करुन देण्याची, अशी ग्वाही आमदार रोहित पवारांनी प्रशासनाला दिली. त्यामुळे प्रशासनासमोर निर्माण झालेला 'पेच' सुटला. या निर्णयामुळे आता ग्रामीण भागात मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नागरिक येणार नाहीत. त्यामुळे गैरसोयी आहेत, अशी हकाटी पिटविणाऱ्या ग्रामीण भागातील भितीचे वातावरण कमी होण्यास मोठी मदत होईल. 

जामखेड तालुक्याने मागील दोन महिन्यात अनेक 'धडे' घेतले. दोघा परदेशी पाहुण्यांनी कोरोनाचा 'वाणवळा' आणला आणि तब्बल येथील 15 बाधित झाले. एकाने जीव गमवला. बाकीचे या संकटातून बाहेर पडले. मात्र तब्बल दोन महिने संपूर्ण जामखेड 'शांत' झाले. लाॅकडाऊन आणि हाॅटस्पाँट या दोन्ही प्रसंगातून मोठ्या एकजुटीने संघर्ष करून जामखेडकर बाहेर पडले. आता पुन्हा हाॅटस्पाॅटची वेळ येऊ नये, येथे कोरोनाचा रुग्णच मिळू नाही, यासाठी लोकप्रतिनिधीसह प्रशासनाने कंबर कसली आहे. हे मात्र निश्चित !

सरकारनामा, सकाळची भूमिका निर्णायक

जामखेड तालुक्यात प्रशासनाने मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येथे येणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांच्या मूळ गावी क्वारंटाईन करण्याऐवजी जामखेड येथेच क्वारंटाईन करावे, अन्यथा कोरोनाचा ग्रामीण भागातील फैलाव रोखणे अवघड होईल, अशी भूमिका सकाळ, सरकारनामा, ई-सकाळ च्या माध्यमातून मांडली होती. ही बाब प्रशासनाने गांभिर्याने घेतली. यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या तालुकास्तरावर बैठका होऊन यांवर एकमत झाले. अधिकाऱ्यांनी ही बाब प्रांताधिकारी आर्चना नष्टे यांच्यासमवते झालेल्या बैठकीत पुनःचर्चेत घेतली. त्यांनाही हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यानंतर व्यवस्था कशी आणि कुठे करायची यावर 'खल' सुरु झाला. येणारे नागरिक जामखेड मध्ये ठेवायचे कोठे? त्यांना सुविधा पुरवायच्या कशा? तसेच ऐवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था कोण करणार? पिण्याच्या पाण्याची व सांडपाणी व्यवस्थापन कशी होणार ?  या सर्वांना शौचालय व्यवस्था उपलब्ध कशी करणार ?  असे ऐक ना अनेक प्रश्न प्रशासना समोर आले. यातून मार्गाचा शोध सुरुच होता. अखेर ही सर्व स्थिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आमदार रोहित पवारांच्या कानावर घातली. सर्व स्थितीची माहिती दिली. तालुका अरोग्य अधिकारी डाँ. सुनील बोराडे यांनी ही या प्रस्तावाला अनुमोदन देणारी माहिती सांगितली.

आमदार रोहित पवार यांनी पेच सोडविला

आमदार रोहित पवार यांनी मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या ; जामखेडमध्ये क्वारंटाईन होणाऱ्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था तसेच यांच्या राहण्याच्या ठिकाणी शौचालयाची उभारणी करुन देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आमदार पवार यांनी पुढाकार घेताच प्रशासनासमोर निर्माण झालेला पेच सुटला आणि तालुक्यात येणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना आजपासून जामखेडलाच कोरांटाईन करण्यास सुरुवात ही झाली.


सर्वांना जामखेडमध्येच क्वारंटाईन करणार : नाईकवाडे
मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांना ग्रामीण भागात पुरेशा सुविधा  देता येणार नाहीत. तसेच त्यांच्या माध्यमातून कोरोणाचा फैलाव झाला, तर तो रोखणे मोठे अवघड होईल. यासाठी या सर्वांना जामखेडला कोरोंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com