केंद्राने शेतीमालाला हमी भाव दिल्यास मी भाजपवाल्यांची सेवा करीन

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जेवढी वातावरणनिर्मिती केली, त्या प्रमाणात त्यांना विजय मिळाला नाही. या निवडणूक निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही पडसाद उमटणार नाहीत.
bacchu kadu.png
bacchu kadu.png

नगर : "केंद्र सरकारने शेतमालाचा 50 टक्‍के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतमाल खरेदी करावा. असा बदल केंद्र सरकारने त्यांच्या कृषी विधेयकांत केला, तर मी भाजपमध्ये जाईन, त्यांची सेवा करीन,'' असा उपरोधिक टोला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लगावला.

जलसंपदा कार्यालयात दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन मंत्री कडू यांच्या हस्ते झाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ""केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा राज्य सरकारने नाकारला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कोणताही कायदा करताना, आमच्या संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या दोन मागण्या त्यात घ्याव्यात. शेतमालाचा 50 टक्‍के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतमाल खरेदी करावा.'' 

शेतीमालाच्या किमतीबाबत कडू यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. केंद्राने शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. शेतीमालाला हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकरी सुधारणार नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे. शेतीविरोधात कायदे करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याआधी त्यांनी शेतकरी संघटनेशी चर्चा करायला हवी, असे मत कडू यांनी व्यक्त केले.

सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली. त्यामुळे झालेला खर्च भरून कसा निघणार, असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केंद्राने करायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बिहार निवडणुकीचा महाराष्ट्रात परिणाम नाही

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जेवढी वातावरणनिर्मिती केली, त्या प्रमाणात त्यांना विजय मिळाला नाही. या निवडणूक निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही पडसाद उमटणार नाहीत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. बिहार निवडणुकीत त्याचा अनुभव आल्याचे मंत्री कडू यांनी सांगितले. प्रत्येक राज्यात अशी परिस्थिती निर्माण होत असते. चढ-उतार हे निवडणुकीनंतर ठरलेलेच असतात, असे ते म्हणाले.

कोणी म्हणत असेल की महाविकास आघाडी सरकार पडेल, आगामी काळात भाजप सत्तेवर येईल, परंतु ते महाराष्ट्रात तरी शक्य नाही. बिहारच्या निवडणुकीत जरी भाजपला यश आले असले, तरी त्यांनी केलेला प्रचार, विविध नेत्यांनी केलेल्या सभांच्या मानाने हे यश तोडकेच आहे. त्यामुळे भाजपने या लहानशा यशाने हुरळून जाऊ नये. या यशाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीच परिणाम होणार नाही, असे कडू यांनी सांगून भाजपवर आरोप केले. महाविकास आघाडी आगामी काळातही स्थिर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com