जाळलेल्या 'कडवट' ऊसाचा शेवट 'गोड' ! गडाखांच्या कारखान्याकडून नोंद व तोडही

मागील महिन्यात करजगाव येथील शेतकरी अशोक टेमक यांनी मुळा कारखाना उसाला तोड देत नसल्याने अडीच एकर उसाचे पीक पेटून दिले.
Shankarrao gadakh.jpg
Shankarrao gadakh.jpg

सोनई : मुळा साखर कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोडही देत नसल्याने जाळण्यात आलेला उस वाजतगाजत मिरवणूकीने कारखान्यावर नेण्यात आला. संपूर्ण राज्यात गाजलेला हा विषय 'गोडी'त मिटला आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या कारखान्याने ऊस घेतल्याने अखेर हे प्रकरण मिटले आहे.

मागील महिन्यात करजगाव येथील शेतकरी अशोक टेमक यांनी मुळा कारखाना उसाला तोड देत नसल्याने अडीच एकर उसाचे पीक पेटून दिले. हनुमानवाडी येथील ॠषीकेश वसंत शेटे यांनी याच कारणामुळे दीड एकर उसाचे पीक पेटवून दिले होते. हा प्रश्न संपुर्ण राज्यात चांगलाच गाजला होता.

जाळलेला उस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर नेवून टाकण्याचे आंदोलन शेटे यांनी जाहीर केले होते. परंतु मुळा कारखान्याच्या शेतकी विभागाने नोंद घेवून तोड दिल्याने आनंद म्हणून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली. इतर शेतकऱ्यांची नोंद घेवून तोडीचे अश्वासन दिल्याने जाहीर केलेले आंदोलन रद्द केले, असे ॠषीकेश शेटे यांनी सांगितले.

शेतकी विभागाचे दीपक कर्जुले, मधुकर सुरसे व मास्तर मांडे यांनी जाळून टाकलेल्या उसाची बांधांवर जाऊन नोंद घेत नियमानुसार तोड दिली. यापूर्वी नोंद दिलेली नव्हती, असे सुरसे यांनी सांगितले.

मुळा कारखान्याच्यावतीने कुणाचीच अडवणूक केली जात नाही. करण्यात आलेले आंदोलन फक्त स्टंटबाजी होती, असे 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी सांगितले.

हेही वाचा...

ना नफा, ना तोटा तत्वावर मास्क विकण्याचे आवाहन

श्रीरामपूर : कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून, नागरिकांनी सुरक्षित उपाय म्हणून मास्कचा वापर करणे गरजे बनले आहे. त्यामुळे मास्कची विक्री ना नफा, ना तोटा तत्वावर करुन कठिण काळात मानवतेचा दृष्टीकोण जपण्याचे आवाहन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे निमंत्रक रवींद्र गुलाटी यांनी केले आहे.

केमिस्ट हा आपल्या व्यवसासोबत समाजसेवा करतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या औषधांची सुचनेनुसार मार्गदर्शन करतो. तसेच देशभरात कुठल्याही प्रकारचे संकटे आल्यास केमिस्ट संघटना गरजुंसाठी मदतीची धाव घेते. त्यासोबत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना, वयोवृद्ध आश्रमाला केमिस्ट संघटना मदतीचा हात देते.

कोरोनामुळे अनेकजण आर्थिक अडचणीत सपडले आहेत. सध्या काही ठिकाणी वाढीव दराने मास्क विक्री केली जात असल्याने सरकार त्यावर कारवाई करणार असल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व केमिस्ट आणि ड्रगिस्ट बांधवांनी पुन्हा एकजूट होऊन सामाजिक सेवा करण्याची वेळ आली आहे. 

समाजकार्यासाठी केमिस्ट असोसिएशनने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी अद्याप प्रभावी औषध उपलब्ध झाले नसल्याने कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे हाच एकमेव उपाय आहे. म्हणून मास्कची विक्री ना नफा, ना तोटा तत्वावर करावी. सामाजिक बांधिलकी जपुन नागरिकांना मास्क उपलब्ध करुन देण्याचे, आवाहन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे गुलाटी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com