राहुरी : राज्य सरकारने नवीन कृषी धोरणात सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कार्यान्वित सौरऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी कृषी पंपाचे भार असलेल्या राज्यातील 68 उच्चदाब वीजवाहिन्यांवर प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्यास महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरपासून सुरवात केल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी खुर्द येथे मुळा नदीकाठी घाट बांधून स्मशानभूमीची विकासकामे, शनिशिंगणापूर रस्ता ते शेडगे वस्ती रस्त्याचे खडीकरणाचा प्रारंभ मंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच पिरताजी चोपडे होते. राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे आदी उपस्थित होते.
मंत्री तनपुरे म्हणाले, ""राहुरी खुर्द येथील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान केले. त्यातून उतराई होण्यासाठी विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत वांबोरी, आरडगाव, चिंचोली, ताहराबाद येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. राहुरी खुर्द येथे जागेची अडचण आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी एखाद्या शेतकऱ्याने जमीन उपलब्ध करून दिली, तर त्यांना शासन मोबदला किंवा भाडे देण्यास तयार आहे.''
कोरोनामुळे यावर्षी निधीअभावी विकासकामे रखडली. कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्यावर, मतदारसंघात विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

