भूसंपादनात विस्थापितांना न्यायासाठी काॅंग्रेसचा कर्जतमध्ये `रास्ता रोको`

नगर- सोलापूर मार्गावर याच राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी.
congress.png
congress.png

कर्जत : तालुक्यातील पाटेगाव येथे नगर - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात विस्थापित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कैलास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली नगर - सोलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

फेर पाहणी, मूळ दस्तऐवज व इतर तपासणी नंतर उचित कार्यवाही करण्यात येईल येईल, असे आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी अनिल भापकर, कृषी पर्यवेक्षक भरत गाढवे व नवनाथ जत्ती, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अॅड. हर्ष शेवाळे, सरपंच गोकुळ ईरकर, परशुराम देवकर, बाळासाहेब भंडारे, गजेंद्र शेवाळे सुनील जाधव, अशोक भोसले आदींसह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

नगर- सोलापूर मार्गावर याच राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच कामगार तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, त्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, तसेच भूसंपादन झालेल्या पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली.

या वेळी अॅड. कैलास शेवाळे म्हणाले, की नगर-सोलापूर मार्गासाठी संपादित जमिनीसाठी काही ठिकाणी वापरण्यात आलेला चुकीचा नकाशा दुरुस्त करून पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच जमिन संपादनामुळे झालेले विस्थापित कुटुंब यांना योग्य न्याय व नुकसानग्रस्त शेतकरी यांचे तत्काळ नुकसानीचे पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

दरम्यान, भूसंपादनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून आहे. विस्तापितांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाला अनेकवेळा मागणी केली होती. तथापि, चुकीचे भूसंपादन झाल्याची भावना ग्रामस्थांची आहे. याबरोबरच इतर मागण्याही आंदोलकांनी केल्या. आज रास्ता रोकोमुळे प्रवाशांचे हाल झाले. नगर - सोलापूर मार्गावर लांब पल्ल्याच्या ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन जास्त वेळ करू नये, असे संकेत असतानाही आंदोलकांनी आंदोलन चालूच ठेवले. परिणामी दुतर्फा वाहनांची गर्दी झाली.

पंचनाम्याबाबत आंदोलन करून घरचा आहेर

कृषी सहाय्यक, तलाठी यांच्या चुकीच्या धोरणामुळे चुकीचे पंचनामे होत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. सध्या काॅंग्रेस पक्ष सत्ताधारी आहे. असे असताना त्यांनी तलाठी, कृषी विभागाला आदेश देणे अपेक्षित होते. मात्र मागण्यांसाठीच सत्ताधारी काॅंग्रेसला आंदोलन करण्याची वेळ आली, ही पक्षाच्या दृष्टीने लांछनास्पद बाब असल्याचे इतर पक्षातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com