राळेगणसिद्धी : ``समाजासाठी चांगले काम करणारी जी काही माणसे आहेत. त्यात बच्चू कडू आहेत. निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करीत नाही. पण बच्चू कडू यांचे काम चांगले असल्याने त्यांच्या प्रचारासाठी गेलो होतो,`` अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे काैतुक केले.
कडू यांनी आज राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेऊन राज्यातील शेतीप्रश्नांविषयी सुमारे एक तास चर्चा केली. या वेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, शरद जोशी शेतकरी विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, सुरेश पठारे, दत्ता आवारी, संदिप बामदळे, विकास गटकळ, हरिचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
केंद्राने बनवाबनवी केल्यास आम्ही अण्णांच्या मागे उभा
शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगीत केले आहे. पण आंदोलन मागे घेतले म्हणजे आंदोलन थांबलेले नाही. केंद्र सरकारने बनवाबनवी केली, तर अण्णांच्या आंदोलनाच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
कडू म्हणाले, की मंत्री झाल्यावर हजारे यांची भेट झाली नव्हती. अण्णांना भेटल्यावर उर्जा मिळते. अधिक चांगले काम करता येते. राज्यातील शेती प्रश्नांवर अण्णांबरोबर मी चर्चा केली. राज्य, जिल्हा बदलला की शेतीचे प्रश्न बदलतात. पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यातील खिनखिनी गावात "रोहयो'अंतर्गत पेरणी ते काढणीपर्यंतचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमाला दीडपट हमी भाव देण्याचा एक वेगळा प्रयोग राबविण्याचा संकल्प मी केला आहे. त्यासाठी अण्णांचे मार्गदर्शन घेतले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.