राष्ट्रवादीचे काही आमदार फिरतात अपक्षांसोबत : संग्रामसिंह देशमुख 

सरकारने एखादे महामंडळ पदवीधारांसाठी काढावे. तसेच शासनाचा एक स्वतंत्र विभाग काढावा, त्यातून पदवीधारांचे प्रश्न निकाली काढण्यात यश येऊन त्यातून एक चळवळ निर्माण होईल. रस्त्यावर उतरून चळवळ करण्याचा अनुभव असल्याने मला यामतदारसंघात मतदार काम करण्याची संधी देतील.
Sangramsinh Deshmukh
Sangramsinh Deshmukh

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघात विरोधकांना बंडखोरी थोपविण्यात अपयश आलेले आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार अपक्षांसोबत फिरताना दिसत आहेत. एकुणच महाविकास आघाडीविषयीची नाराजी या निवडणुकीत उद्याच्या मतपेटीतून दिसेल, असा गौप्यस्फोट पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी केला आहे.  

साताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यूव येथे संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या मतदारसंघातून भाजपचे २४ वर्षे प्रतिनिधीत्व केले. यामध्ये प्रकाश जावेडकरांनंतर चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, चंदकांत पाटील, तसेच भाजपच्या नेते मंडळींनी मला उमेदवारी देऊन या मतदारसंघातील ५८ तालुक्यातील मतदारांची सेवा करण्याची संधी दिली आहे.

भाजपच्या सरकारने या मतदारसंघातील पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही प्रश्न बाकी आहेत. यानिमित्ताने मी अश्वस्त करतो, की  स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बँक, विविध संस्थांच्या सामाजिक वारसा तसेच तेथील अनुभवाच्या जोरावर व मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर येणाऱ्या काळात मी आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. 

भाजपच्या सत्ता काळात नोकर भरतीचा प्रश्न होता. तो प्रश्न निकाली लागला असता तर पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटला असता. पण आता सरकारने एखादे महामंडळ पदवीधारांसाठी काढावे. तसेच शासनाचा एक स्वतंत्र विभाग काढावा, त्यातून पदवीधारांचे प्रश्न निकाली काढण्यात यश येऊन त्यातून एक चळवळ निर्माण होईल. रस्त्यावर उतरून चळवळ करण्याचा अनुभव असल्याने मला यामतदारसंघात मतदार काम करण्याची संधी देतील.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे मुळचे केडर सक्षम आहे. भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पदवीधरांच्या घरी जाऊन मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. माझा आणि सातारा जिल्ह्याचा दोन पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. माझ्या वडीलांनी कऱ्हाड न्यायालयात वकिली केली. माझे शिक्षणही कराड शहरात झाले आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचे संघटन आहे. त्या जोरावर खुप पाठबळ आहे. सध्या आम्हीपदवीधर मतदारांच्या गाठीभेटी, मेळावे घेऊन आमची भुमिका त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत.

या मतदारसंघातील पदवीधरांनी सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्या विजयात सातारा जिल्हा आघाडीवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात भाजप एकसंघ असून विरोधकांना बंडखोरी थोपविण्यात अपयश आलेले आहे. तर मतदारसंघात राष्ट्रवादीचे काही आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार सोडून अपक्षांसोबत फिरताना दिसत आहेत. एकुणच महाविकास आघाडीविषयीची नाराजी या निवडणुकीत उद्याच्या मतपेटीतून दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सदाभाऊंच्या नाराजी विषयी ते म्हणाले, सदाभाऊ खोत आमचे नेते आहेत. त्यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दूर केली. त्यामुळे मतभेद विसरून ते पुन्हा कामाला लागले आहेत.

दोन्ही राजांचा आशिर्वाद माझ्यासोबतच...

साताऱ्यातील दोन्ही राजांची मदत घेणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, आज अजिंक्यतारा कारखान्यावर शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा झाला आहे. उदयनराजे आमच्यासोबत उद्या येणार आहेत. साताऱ्याचे दोन्ही महाराज हे आमचे आदराचे स्थान असून ते आम्हाला या निवडणुकीत आशिर्वाद देण्यासाठी कायम पाठीशी राहणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com