सातारा : कोरोनाच्या संकटात शेतकरी उध्वस्त झाला आहे. यंदा शेतक-यांची दिवाळी ही कडू झाली आहे. सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामधून ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपूरवठा विभाग या सर्वांना निधी विभागून दिला आहे. शेतक-यांच्या वाट्याला केवळ पाच हजार कोटी येतील हे म्हणजे कोपराला गूळ लावायचा आणि हातानं चाटायचा, अशीच राज्य सरकारची शेतक-यांना मदत आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी क-हाड येथे केली.
श्री. खोत म्हणाले, राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत ही शेतक-यांवर अन्याय करणारी आहे. फळलागवड असणा-या शेतक-यांला प्रतिहेक्टरी एक लाख रुपये देणे आवश्यक आहे. बागायत उत्पादक शेतक-यांना 50 हजार तर कोरडवाहूसाठी 25 हजार रुपये देणे आवश्यक आहे.
दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे घोषणा नको तर लवकर मदत देऊन राज्य सरकारने मेहरबानी करावी. दरम्यान सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती राज्य सरकारच्या वर्मावर बोट ठेऊन बोलत असेल तर त्यांच तोंड बंद करण्यासाठी जून प्रकरण उकरुन काढून अटक केली जात आहे. राज्यामध्ये अशी कितीतरी प्रकरण आहेत. ज्यांच्या चौकशी वर्षानुवर्षे चालली आहेत. परंतु त्यावर ठोस कारवाई होत नाही, असेही खोत यांनी नमूद केले.

