उस्मानाबादः जिल्ह्यातील नागरिक कोरोना संकटाचा मुकाबला करत असतांना ज्यांच्यावर जिल्ह्याचे पालकत्व आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक वेगवान करण्याची जबाबदारी आहे, ते जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख मात्र दोन महिन्यांपासून उस्मानाबादकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा कुणालाही कुणाचा पायपोस राहीला नाही अशी परिस्थिती आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव वाढत असतांना पालकमंत्री गडाख मात्र आपल्याच मतदारसंघात रमले आहेत. त्यामुळे पालकमंत्री हाजिर हो, असे म्हणण्याची वेळ उस्मानाबादकरांवर आली आहे.
कुठल्याही जिल्ह्यातील विकास कामे, आरोग्य संबंधित प्रश्न, इष्ट आपत्तीच्या काळात तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबादारी सोपवली जाते. एखादे नैसर्गिक संकट कोसळले तर अशावेळी पालकमंत्री हेच खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे प्रशासन हाकत असतात.
पण कोरोना सारखे जागतिक संकट उस्मानाबादकरांवर ओढावलेले असतांना जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे २६ मे रोजी जिल्ह्यात बैठक घेऊन जे गेले, ते अजून परतलेले नाहीत. ऐरवी ते आले नाही, बैठका घेतल्या नाही तर समजू शकते, पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना त्यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दुसरीकडे जिल्हा प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याची देखील ओरड होतांना दिसते. या शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अनेक गोष्टी पालकमंत्र्या अभावी रखडल्या आहेत. अशावेळी जिल्ह्यातील नागरिकांना माजी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मुधकर चव्हाण यांची प्रकर्षाने आठवण होते. स्थानिक या नात्याने त्याकाळत जिल्ह्यात अनेक विकासाची कामे केली. त्यांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ सोडला तर त्यानंतर आलेल्या सर्वच पालकमंत्र्यानी जिल्ह्याची घोर निराशा केल्याचे दिसून आले.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री म्हणुन शंकरराव गडाख यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र त्यांनी जिल्ह्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले, बैठकीपुरते जिल्ह्यात काही तासांचा दौरा करून ते निघून जात असल्याने उस्मानाबादकरांचा भ्रमनिरास होत आहे. ही प्रथा जिल्ह्याला आता काही नवीन राहिलेली नाही, या आधी शिवसेनेचे दिपक सावंत, दिवाकर रावते व अर्जुन खोतकर हे देखील फक्त शासकीय झेंडा वंदनाच्या निमित्तानेच जिल्ह्यात यायचे. शंकरराव गडाख हे त्यांचाच कित्ता गिरवतात की काय? अशी भिती जिल्ह्यातील नागरिकांना वाटू लागली आहे.
या अगोदर दुष्काळी परिस्थिती असायची आता जिल्ह्यासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे, अशा परिस्थितीत पालक म्हणुन पालकमंत्र्याची भुमिका अत्यंत महत्वाची ठरते. पण २६ मे रोजी बैठक घेऊन गेलेले गडाख पुन्हा जिल्ह्यात आलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेची कोरोनाच्या काळात फरफट सूरु आहे. गोंधळलेले जिल्हा प्रशासन वेगवेगळे आदेश काढत असुन लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेतले जात नाही असा, आरोप केला जातोय. गेल्या काही महिन्यापासुन जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असतानाही कोरोना टेस्टिंग सेंटर अजुनही सुरू होई शकलेले नाही.
Edited By: Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.