औरंगाबाद ः शहरातील लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशीही नागरिकांनी संचारबंदीला उत्सफूर्त प्रतिसाद प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावला आहे. पुढील चार दिवस असाच संयम दाखवून संचारबंदीचे पालन शहरवासियांनी करावे, जेणेकरू कोरोना रुग्ण व मृतांची संख्या कमी करण्यात यश येईल. खऱ्या अर्थाने ही औरंगाबादकारांच्या संयमाची परीक्षा आहे, आतापर्यंत या परीक्षेत नागरिक पास झाले आहेत, पुढे ही त्यांनी असाच संयम दाखवावा, असे आवाहन शिवसेनेचे आमदार जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले.
साडेआठ हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आणि साडेतीनशेहून अधिक मृत्यू झाल्याने औरंगाबाद जिल्हा हादरून गेला. दोन महिने लॉकडाऊन असून देखील कोरोनाचा प्रादुर्भाव आधी शहर आणि नंतर ग्रामीण भागात वाढला. यावर लॉकडाऊनचे पालन लोकांनी केले नाही, शिथिलता द्यायला नको होती, काही भागातच लोकांनी नियम पाळले, प्रशासनात समन्वय नव्हता, असे अनेक आरोप आणि टिका दरम्यानच्या काळात झाली. पण टिका किंवा कुणावर दोषारोप करून हा प्रश्न सुटणार नाही या भूमिकेतूनच लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि व्यापारी, उद्योजकांनी एकत्रितपणे शहरात पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेतला.
शहरवासियांनी देखील आपली जबाबदारी ओळखून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले, आज पाचव्या दिवशी देखील नागरिकांनी घरातच थांबून ज्या संयमतेचा परिचय दिला त्याला तोड नाही, असे गौरवोद्दगार काढत आमदार अंबादास दानवे यांनी नागरिकांचे आभार मानले. अंबादास दानवे म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नव्हते, त्यासाठी लोकांनी लॉकडाऊनचे पालन करून घरात राहणे गरजेचे होते. जेणेकरून अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करून पॉझीटीव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवणे शक्य होणार होते.
पोलीस, महापालिका, आरोग्य व जिल्हा प्रशासनाने गेल्या पाच दिवसांत घेतलेली मेहनत आणि त्याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद वाखाणण्या जोगा आहे. शहराता महापालिकेने ५० हजार ॲन्टीजेन टेस्ट करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या तपासण्या होऊन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. महापालिके प्रमाणेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दहा हजार ॲन्टीजेन टेस्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी देखील न घाबरता तपासणी करून घ्यावी, जेणेकरून मनातील भिती नाहीसी होईल.
वाळुज, बजाजनगरात संख्या घटली..
वाळुज, बजाजनगर भागात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. दररोज ६० ते ७० रुग्ण आढाळयाचे, ते रोखण्यासाठी आपण गेल्या ४ तारखेपासून या भागात देखील लॉकडाऊन घेतला. त्यांचे चांगले परिणाम दिसायला लागले आहेत, तिथे आता ८ ते १० रुग्णापर्यंत प्रमाण घटले आहे.
लोकांनी संचारबंदीला दिलेला पाठिंबा आणि नियमांचे केलेले पालन यामुळेच हे शक्य होऊ शकले. त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला शहरात करायची आहे. पाच दिवसापासून तुम्ही ज्या जबाबदारीने हा लॉकडाऊन यशस्वी केला, ते पाहता शहरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या व संसर्गाची साखळी आपण निश्चित तोडून, असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.