औरंगाबादः पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लावून धरला. मंदिर उभारणीच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीच्या आधी अयोध्येत केलेला दौरा आणि घेतलेला पुढाकार याचाच हा परिणाम आहे, की अयोध्येत रामजन्मभुमी स्थळी मंदिराचे भुमीपूजन पंतप्रधानांनी केले, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. प्रभु रामांविषयी श्रध्दा असली पाहिजे, मात्र त्यांच्या नावाने राजकारण केले जाऊ नये, असा टोलाही त्यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्य आणि देशभरातून हजारो शिवसैनिकांनी कारसेवेसाठी अयोध्येकडे धाव घेतली होती, त्या पैकीच मी एक. वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त झाल्यानंतर प्रभु श्रीरामांचा जन्म झाला त्या ठिकाणी रामल्लांची जी मुर्ती सध्या विराजमान आहे, ती ठेवण्यात माझा सहभाग होता, माझे हात रामलल्लांच्या मुर्तीला लागले हे माझ्य भाग्य समजतो, अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी १९९२ मध्ये झालेल्या कारसेवेच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य राम मंदिर निर्माण कार्याचा शुभारंभ भुमीपूजनाने झाला. त्यानंतर देशभरात ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करून आनंदोत्व साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या वतीने औरंगाबादेतील क्रांतीचौकात श्रीराम पुजनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर हा सार्वजनिक पुजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या संपर्क कार्यालय व निवासस्थानी मात्र प्रभु श्रीरामाचे पुजन केले.
पत्रकारांशी बोलतांना खैरे म्हणाले प्रभू रामांविषयी श्रद्धा असली पाहिजे, मात्र त्यांच्या नावाने राजकारण केले जाऊ नये. अयोध्येत राममंदिराच्या कामाला सुरवात झाली आणि कारसेवकांचे स्वप्न पूर्ण झाले. शिवसेना पक्षप्रमुखांनी मंदिर बांधण्याची घोषणा केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या आणि मंदिराच्या कामाला सुरवात झाली, हा शिवसेनेचा विजय आहे. अयोध्येत कारसेवेसाठी औरंगाबादमधून खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गेले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना कारसेवा करा, असे आदेश देताच, आम्ही सर्व आमदार त्यात सहभागी झालो होतो.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी सर्व ठिकाणचे शिवसैनिक मोठ्या संख्येने कारसेवेसाठी अयोध्येत दाखल झाले होते. रामजन्मभूमी मुक्त केल्यानंतर तेथील दगड, माती, विटा, मलबा हटवण्याचे काम माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी केले. सध्या तिथे रामलल्लाची जी मूर्ती आहे ती आम्ही सर्वांनी मिळून तिथे बसवली होती. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, की त्या मूर्तीला माझा हात लागला.
राममंदिराच्या निर्माण कार्याला लवकर सुरवात व्हावी यासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये उत्तर प्रदेश शिवसेनेतर्फे अयोध्येत तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध लादले असतानादेखील आम्ही तिथे रामभक्तांचा मेळावा घेतला होता असेही खैरे यांनी सांगितले. अयोध्या आंदोलनात शिवसेनेचा सर्वांत मोठा सहभाग होता.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राममंदिर व्हावे यासाठी अयोध्येला भेट दिली, घोषणा केली तेव्हा कुठे हालचालींनी वेग घेतला आणि राममंदिराच्या बांधकामासाठी आता सुरवात झाली. यामुळे हा शिवसेनेचा विजय आहे. आज कारसेवकांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.