नांदेड : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी २५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत संचारबंदी लावली आहे. सदर लॉकडाउन कालावधीत नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण धार्मिकस्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, प्रार्थनास्थळे इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हल्लाबोल मिरवणुकीच्या दरम्यान काही तरुणांनी गोंधळ घालत पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यातील हल्लेखोरांना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही व कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिला.
हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नाकारल्याच्या रागातून काल शिख तरुणांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला होता. यात अनेक अधिकारी, पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्या वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेऊन शेकडो अज्ञात हल्लोखोरांविरोधात गुन्हे दाखल केले. या संदर्भात सविस्तर माहिती पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पत्रकारांना दिली.
शेवाळे म्हणाले, २९ मार्च रोजी होळी सणानिमित्त शीख समाजाच्या वतीने दरवर्षी हल्लाबोल मिरवणुक काढण्यात येते. सदर हल्लाबोल कार्यक्रमासाठीगुरुद्वारा प्रशासनाने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. परंतु जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या संचारबंदीच्या आदेशाच्या अनुषंगाने परवानगी नाकारण्यात आली होती. मिरवणूक काढू नये यासाठी शीख समाजाचे धर्मगुरु, गुरुद्वाराचे प्रशासकीय समितीचे पदाधिकारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा, बैठका झाल्या.
मिरवणूक सचखंड गुरुद्वारा परिसरातच काढण्यात येईल असे गुरुद्वारा प्रशासकीय समितीने सांगितले होते. परंतु दुपारी चारच्या सुमारास अरदास झाल्यानंतर गुरुद्वाराच्या आतहल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. मात्र यावेळी काही तरुण मुले हल्लाबोल मिरवणूक बाहेर काढण्याच्या तयारीत असताना धर्मगुरु त्यांना बाहेर मिरवणूक न काढण्याची विनंती करत होते. पण तरुणांनी धर्मगुरुंचे व पोलिसांचे न एकता उलट पोलिसांवर तुफान दगडफेक केली.
बंदोबस्तासाठी लावलेले बेरिकेटींग तोडुन तलवारी व लाठ्याकाठ्याने पोलिसांवर हल्ला केला. यात सात पोलीस अंमलदार जखमी झाले असून पोलिसांच्या आठ शासकीय वाहनांची प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेच्या अनुषंगाने वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास चारशे जनावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१८ जणांना पोलिसांनी अटक केली असून.जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसावर केलेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने कोणाचीही गय केली जाणार नाही. सदर प्रकरणातील दोषींना ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असेही पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.
Edited : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.