मुंबई: नाशिकमध्ये स्टॅंमपेपरचा तेलगी घोटाळा २००० साला आधी झाला होता. सुरुवातीला या घोटाळ्याची व्याप्ती कमी वाटत होती, पण नंतर राज्यभरात तो पसरल्याचे आणि कोट्यावधींचा स्टॅमपेपर घोटाळा उघडकीस आला होता. आता पुन्हा गोटू वाघ नावाचा नवा तेलगी नाशिकमध्येच निर्माण झाला असून जुनी खेरदीखत काढून त्या आधारे कोट्यावधींच्या मालमत्या आपल्या व इतरांच्या नावावर केल्या जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधीमंडळात २९३ च्या प्रस्तावावर चर्चा करतांना देवेंद्र फडणवीस यांनी वीस-एकवीस वर्षा पुर्वीच्या तेलगी घोटाळ्याची आठवण करून देत त्याचा प्रकारचा मोठा घोटाळा पु्न्हा एकदा नाशिकमध्ये झाल्याचा आरोप केला. फडणवीस म्हणाले, गोटू वाघ नवाचा दुय्यम निबंधक हा खऱ्या अर्थाने या घोटाळ्याचा सुत्रधार आहे. मुद्रांक शुल्क कार्यालयातून जुन्या खरेदी खताच्या प्रत काढून त्यावर सत्यप्रत असे शिक्के मारले जात आहेत. खरेदी खतावरील क्रमांक कायम ठेवून त्यात फेरबदल करून कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता या गोटू वाघने स्वतः व इतरांच्या नावे केल्या आहेत
समोर आलेल्या माहितीनूसार आतापर्यंत ५० हजाराहून अधिक खरेदी खतांचा वापर करून अशा प्रकारच्या मालमत्ता हडपण्यात आल्या आहेत. यात मुद्रांक अधिकारी देखील सहभागी असून आॅनलाईन दुरस्त्या करून कोट्यावधींची संपत्ती विकली जात आहे. हा नवा तेलगी घोटाळा असून याची कसून चौकशी केल्यास यातून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी फडणवीसांनी केली.
राज्यात महसुल-पोलीस आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगनमाताने राज्यात वाळु माफिया निर्माण झाल्याचा आरोप करतांनाच अपसेट प्राईज वाढवून टेंडर घेण्यासाठी कुणीच येणार नाही अशी परिस्थिती जाणूबुजून निर्माण केली जात आहे. मग टेंडर आले नाही म्हणत खाजगी बोली लावून लागेल तेवढी वाळू माफियांच्या घशात घातली जात आहे. हा सगळा प्रकार थांबवून राज्याचा बुडणार महसूल वाचवण्यासाठी रेती घाट तात्काळ सुरू करा, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली.
मुंकेश अंबानी प्रकरणाचा तपास एनआयएला द्या
मुकेश अंबानी हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. देशाच्या जीडीपीत त्यांचा मोठा वाटा असतो, त्यांच्यामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. परंतु २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुंबईतील घरासमोर जिलेटीनच्या कांड्या भरलेली गाडी, धमकीचे पत्र प्राप्त झाले.
या प्रकरणात गाडीचा मालक, ठाण्यात या प्रकरणा संदर्भात दोन व्यक्तीमध्ये झालेले संभाषण, जिलेटीनची गाडी सापडताच तिथे स्थानिक किंवा क्राईम ब्रॅचच्या आधी पोहचलेले पोलिस अधिकारी सचीन वाझे आणि नंतर त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेऊन तो दुसऱ्याकडे सोपवणे या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे. गृहमंत्र्यांनी या बद्दल सभागृहात माहिती तर द्यावीच पण या संपुर्ण प्रकरणाचा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात देखील फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सांख्यिकेच्या आधारावर कायदा व सुव्यवस्थेचे मुल्यमापन न करता लोकांना किती सुरक्षित वाटते यावर स्थिती ठरवावी असे सांगतांनाच फडणवीस यांनी गेल्या वर्ष दीड वर्षात राज्यात घडलेल्या महिलांवरील अत्याचार, खून, दरोडे, चोऱ्यांच्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात मांडली.
यात प्रामुख्याने उस्मानाबाद जिल्ह्यात पारधी महिलेवर पोलिसानेच पिस्तूल ऱोखत केलेला बलात्कार, ज्या हिंगणघाट येथील अंकिता मुळे प्रकरणामुळे आपण शक्ती कायदा आणतो आहोत, तिच्या कुटुंबियांना अद्यापही न मिळालेला न्याय, पोलिसांना रंडीची अवलाद म्हणणारे अनिल गोटे यांच्यावर साधा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाही याचा उल्लेख फडणवीस यांनी केला. आमच्याकडे असतांना त्यांनी असे विधान कधी केले नाही, तुमच्या संगतीचा हा परिणाम असल्याचा टोला देखील फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.