अंकूशनगर : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे ५६ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. येथील आंदोलनकर्त्या महिलांनी मंगळवारी (ता.१६) पोलिसांच्या काठ्या हिसकावत पोलिसांनाच घेराव घातला. दरम्यान मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता.१६) साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्यात येणार होती. मात्र बारामतीला निघण्यापूर्वीच येथील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मराठा आरक्षण मागणीसाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. येथील आंदोलनाला सरकार गांभिर्याने घेत नसल्याने या आंदोलकांनी मंगळवारी साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्याचे ठरवले होते.
मात्र, पोलिसांना याची माहिती मिळताच सकाळी साष्टपिंपळगाव येथील मुख्य आंदोलकांना तहसीलदारांच्या आदेशानंतर ताब्यात घेण्यात आले. यात मनोज जरांगे, संजय कटारे, शहादेव औटे, संपत शिंदे, दादासाहेब राक्षे, सुनिल औटे, दादासाहेब बोचरे यांचा समावेश आहे.
मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ काढण्यात येणार होती. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर येथील महिला आंदोलकांनी चक्क पोलिसांच्या काठ्या हिसकावत त्यांनाच घेराव घातला.
त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून आंदोलकाना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपी ही येथील महिला आंदोलकांनी केला.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.