औरंगाबाद ः अंबोजागाई शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल २२ जणांचे मृतदेह एखाद्या वाहनात जनावरे कोंबावित तशी नेण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला. सोशल मिडिया, प्रसार माध्यांमध्ये या संदर्भाती छायाचित्र आणि बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ज्यांच्या मृत्यू झाला त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करू, की त्यांच्या मृतदेहा सोबत जो प्रकार घडला त्याबद्दल संताप हेच मला कळत नाही, अशा शब्दांत पंकजा त्यांनी अंबाजोगाई रुग्णालय व जिल्हा प्रशानसाबद्दल चीड व्यक्त केली.
राज्यात व विशेषतः मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड या मोठ्या शहरांमध्ये रुग्ण संख्या व मृतांचे प्रमाण चिंता करायला लावणारे आहे. दुसरीकडे उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. रेमडिसिव्हर इंजेक्शन, आॅक्सिजनचा तुटवडा, रुग्णांना बेड मिळत नाही ही परिस्थिती. तर दुसरीकडे मृतांवर अंत्यसंस्कार करायला देखील जागा नाही.
अशातच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयाचा एक भयंकर प्रकार नुकताच उघडकीस आला. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याने त्यांना स्मशानभूमीत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था होऊ शकत नाहीये. त्यामुळे एकाच अॅम्ब्युलन्समधून तब्बल २२ मृतदेह घेऊन जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
गुरं कोबांवी तसे हे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते. या संदर्भात छायाचित्र आणि बातम्या प्रसारित झाल्यानंतर स्थानिक प्रशासन व सत्ताधाऱ्यांची नाचक्की झाली. या प्रकारावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया सोशल मिडियाच्या माध्यमातू दिली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातून एकाच अॅम्ब्युलन्समधून २२ मृतदेह घेऊन जात असल्याचा प्रकार समजला. ही घटना इतर कुठल्या नाही तर माझ्या बीड जिल्ह्यातील आहे, याचे दुर्दैव आणि वाईटही वाटते. मृतांबद्दल दुःख व्यक्त करू, की त्यांच्या मृतदेहाबाबत जो व्यवहार झाला त्याबद्दल संताप हेच मला कळत नाही. प्रकृती बरी नसल्यामुळे सध्या मी होम आयसोलेट आहे.
टीव्हीवर या संदर्भात जेव्हा रुग्णालयाच्या अधिष्ठातांची प्रतिक्रिया पाहिली तेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १७ एप्रिल रोजीच आमच्याकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहन नसल्याचे कळवले होते. त्याची दखल न घेतल्यामुळेच आम्हाला असे करावे लागले, असे उत्तर त्यांनी दिले. एकंदरित अधिष्ठाता जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलत आहेत, तर जिल्हाधिकारी तर बोलूच शकत नाही असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.