औरंगाबाद ः शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या मतदारसंघातील बजाजनगर भागात नुकतेच पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करत काॅक सुरू केला. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागून आहे. असे असतांना शिरसाट यांनी आपल्या समर्थकांसह गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यासह अन्य २५-३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या महिन्यात लाॅकडाऊनचा निर्णय रद्द झाला म्हणून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी त्यांची खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली होती. या जल्लोषाच्या वेळी मास्क, सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवले गेले म्हणून इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांविरुद्ध देखील सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केलेल्या कामाचे श्रेय लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित घ्यावे, पण ते घेत असतांना परिस्थितीचे गांभीर्य देखील ओळखले पाहिजे, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
पश्चिम विधान मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी आपल्याच मतदारसंघातील बजाजनगर भागात राहणाऱ्या एका वसाहतीतील लोकांसाठी पाणीपुरवठा योजना आणली. या योजनेचे काम पुर्ण झाल्यानतंर काल लगोलग त्यांनी उद्घाटन करत काॅक सुरू केला आणि या भागातील लोकांना पाणी दिले. एक विधायक आणि चांगले काम म्हणून याकडे पाहिले जावे, ही अपेक्षा.
परंतु कोरोनाचा संसर्ग, वाढती रुग्णसंख्या, मृतांचे प्रमाण आणि शहरातील बिघडत चाललेली परिस्थिती पाहता शिरसाट यांनी हे उद्घाटन टाळायला हवे होते, गर्दी जमा न करता त्याच भागातील एखाद्या सामान्य माणसाच्या हाताने हा कार्यक्रम उरकायला हवा होता, असे देखील बोलले जाते. परंतु शिरसाट यांनी उद्घाटन केले, तिथे पाच पंचवीस पदाधिकारी, कार्यकर्ते जमवले आणि संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केले.
विरोधकांनी हा मुद्दा उचलत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पोलिसांनी देखील तात्काळ शिरसाट व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या कोरोना आढावा बैठकीत देखील याचे पडसाद उमटले. संजय शिरसाट यांनी आपली बाजू मांडत लोकांच्या प्रश्नासाठी आपण कितीही गुन्हे अंगावर घ्यायला तयार असल्याचे सांगत संताप व्यक्त केला.
पाणी दिल्याने कोरोना वाढणार होता का?
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या समक्ष संजय शिरसाट यांनी पोलिसांच्या या कारवाईवर आश्चर्य व्यक्त केले. शिरसाट म्हणाले, वाळूज एमआयडीसीला लागून असलेल्या बजाजनगर भागातील या नागरिकांना पिण्याचे पाणी दिले हा गुन्हा आहे का? औद्योगिक वसाहतीला चोवीस तास पाणी मिळत असतांना, पाईपलाईन जवळून गेली असतांना देखील गेल्या वीस वर्षापासून नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते.
त्यांना पाणी देण्यासाठी मी काॅक सुरू केला तर गुन्हा केला का? सर्वसामान्य नागिरकांना पाणी दिले तर कोरोना वाढणार होता का? असा सवाल करत त्यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली. ती करत असतांनाच लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामांसाठी असे कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार नाही, असेही शिरसाट म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.