मुंबईः सिल्वासाचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन एका हाॅटेलमध्ये आत्महत्या केली. सात वेळा खासदार असलेल्या या व्यक्तीने मुंबईत येऊनच आत्महत्या करण्याचे कारण आपल्या पंधरा पानी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. गुजरात किंवा आपल्या भागात न्याय मिळणार नाही, मुंबई, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच आपल्याला न्याय देऊ शकेल हा विश्वास व्यक्त करत मुंबईत येऊन आत्महत्या केली.
त्यांना कुणी आणि कसा त्रास दिला याचाही उल्लेख आणि काहीजणांची नावं देखील पत्रात लिहली आहेत. हा गंभीर प्रकार असून ही आत्महत्या होती की हत्या? हे गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी केली.
विधीमंडळातील २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेवर बोलतांना सुनील प्रभु यांनी मोहन डेलकर यांच्या मुंबईतील आत्महत्येवरून काही प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पाकव्याप्त कश्मिर सारखे वाटते असे वादग्रस्त विधान करणाऱ्या कंगना रनावतवर काय कारवाई केली, अशी विचारणा देखील सुनील प्रभु यांनी केली.
प्रभु म्हणाले, मोहन डेलकर यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्रशाशित प्रदेश असलेल्या सिल्वासाचे खासदार असलेल्या डेलकर यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे. पण त्यांच्या या टोकाच्या पावलामागे अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. डेलकर यांना दिल्लीपासून ते आपल्या मतदारसंघात व गुजरातमधील स्वपक्षाच्या नेत्यांकडून कसा त्रास झाला याचा लेखाजोखा आपल्या सुसाईड नोटमधून मांडला आहे.
आत्महत्येसाठी महाराष्ट्रात येण्यामागचे कारण आपल्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी याच पत्रात व्यक्त केली आहे. त्यामुळे डलेकर यांची आत्हत्या होती की हत्या? हे गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगावे.
कोरोना काळात पोलीस, प्रशासन, आरोग्य विभागाने उत्तम काम केल्याचा उल्लेख करतांनाच कोरोना काळात कर्तव्य बजावत असतांना २४ हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. या पैकी ३२४ जणांना आपले प्राण देखील गमावावे लागले.
कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ६५ लाखांचे सुरक्षा कवच शासनाकडून देण्यात आले होते. परंतु यातील १२ जणांना ६५ लाखांची मदत मिळण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या दूर करून या मृतांच्या कुटुंबियांना देखील या पाॅलीसीचा लाभ कसा मिळेल याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही प्रभु यांनी केली.
बांगलादेशी भाजपचा पदाधिकारी कसा?
राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करतांना भाजपचे आमदार मगंलप्रभात लोढा यांनी आमचा कुठलाही पदाधिकारी हा बांगलादेशी नाही, तसे पुरावे असल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन असे आव्हान काल सभागृहात दिले होते. यावर सुनील प्रभू यांनी रुबेल जानू शेख नावाची व्यक्त भाजपच्या अल्पसंख्याक सेलची अध्यक्ष असल्याचे पुरावे सभागृहात सादर केले.
यावर भाजपचे आमदार आशिष शेराल यांनी आक्षेप घेत अशा नावाची कुठलीही व्यक्ती आमचा पदाधिकारी नाही. उद्या कुणीही असे खोटे पुरावे सादर करून दावा करेल, तो आपण खरा मानणार का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच कोणत्याही पक्षात असा बांगलादेशी पदाधिकारी असेल किंवा राज्यात असे घुसखोर असतील तर त्यांची चौकशी करा, अशी मागणीही शेलार यांनी प्रभु यांच्या विधानावर केली.
शक्ती कायद्याची अंमलबजावणी कधी
मुरबाड येथील नितीन तेलवणे या नगरसेवकाचा उल्लेख करत त्यांने महिलेवर अतिप्रसंग केल्या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा प्रभू यांनी केली. राज्यात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे, त्याला सभागृहासमोर मांडून अंमलबजावणी कधी करणार? अशी विचारणा देखील प्रभु यांनी केली.
आरोपी दत्तक योजनेमुळे गुन्ह्याचे प्रमाण किती घटले, महाराष्ट्र पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान करून मुंबई पाकव्याप्त कश्मिर वाटते असे म्हणणाऱ्या कंगना रानावतवर काय कारवाई केली? हे सांगतानाच राज्यात सरकारची बदनामी केली जात असल्याचा उल्लेख करत जळगावची घटना खोटी असल्याचे प्रभु यांनी सभागृहात सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.