तहान लागल्यावर विहिर खोदण्याचे नाटक, अन् केंद्रावर खापर : ठाकरे सरकारचा एककलमी कार्यक्रम

नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड पन्नास हजारांचा आकडा ठोकतात. आणि संजय राऊत ८० हजार इंजेक्शनची गरज असल्याचे फुशारकीने सांगतात.
Bjp Leader Pravin Darekar- Press Conference News Mumbai
Bjp Leader Pravin Darekar- Press Conference News Mumbai

मुंबईः कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला झुकतं माप दिलं असतानाही तहान लागल्यावर विहीर खणून उलट केंद्रावर खापर फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राज्यसरकारकडून सुरू असल्याची  टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

आपलं अपयश सांगता येत नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारकडून वारंवार केला जातो आहे. फक्त केंद्रावर टीका करण्यापेक्षा राज्य सरकारने करोना काळात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी नेमकं काय केलं, याची आकडेवारी सर्वांसमोर आणावी, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. 

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर `आम्ही केंद्राच्या पाया पडायला तयार आहोत, पण केंद्राने राज्याला अधिक ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी मदत करावी`, अशी उपरोधिक विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला केली आहे. टोपे यांच्या या वक्तव्यावर  दरेकर यांनी आपली भूमिका मांडली.
  
केंद्र सरकारविरोधात खडे फोडल्याशिवाय राज्यातल्या मंत्र्यांचा एकही दिवस जात नाही. केंद्रानं दीड हजार मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याची तयारी लगेच दाखवली होती. पण हा ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकार विशेष विमाने किंवा 32 टँकरही उपलब्ध करुन देऊ शकले नाही. ही जबाबदारी देखील सरकार पार पाडू शकले नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे.

राजेश टोपे ३६ हजार इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे सांगतात तर नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड पन्नास हजारांचा आकडा ठोकतात. आणि संजय राऊत ८० हजार इंजेक्शनची गरज असल्याचे फुशारकीने सांगतात.

राज्य सरकारने काय केले?

आज राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आणि आयसीयू बेडस, व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाहीत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारने काय नियोजन केले, याचे उत्तर देण्याऐवजी राज्यातील मंत्री केंद्रावर जबाबदारी ढकलत आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी केली. 
       
ऑक्सीजन तुटवडा एका दिवसात निर्माण झाला नाही. रुग्ण वाढत असताना तुटवडा निर्माण होऊ शकतो, हे वेळीच ओळखून जर सरकारने नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पण प्रत्येक बाबतीत तहान लागली की विहीर खोदण्याचे नाटक करायचे आणि केंद्र सरकारवर खापर फोडायचे, असा पोरखेळ महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. तो थांबला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com