औरंगाबादकरांनी मनावर घेतले; लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी चार दिवस आधी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन गरजेच्या वस्तूंची जमवाजमव करत कडक लॉकडाऊनला सामोरे जाण्याची तयारी केली होती. त्याचा चांगला परिणाम आज पहिल्याच दिवशी दिसून आला. शहराच्या सर्वच भागांमध्ये नागरिकांनी आपल्या घरातच थांबून प्रशासन व आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
aurangabad strict lockdown news
aurangabad strict lockdown news

औरंगाबाद: कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांचे प्रमाण पाहता औरंगाबादमध्ये १० ते १८ जुलै  दरम्यान कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.आतापर्यंतच्या लॉकडाऊनचा मज्जा उडाल्यानंतर मात्र औरंगाबादकरांनी आज खऱ्या अर्थाने कोरोनाशी दोन हात करण्याचे मनावर घेतल्याचे दिसून आले. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरातील रस्ते, गल्ल्या आणि वस्त्या निर्मनुष्य होत्या.

मुख्य रस्त्यांवर होते फक्त बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस. औरंगाबादकरांचा मिळालेला हा प्रतिसाद पाहून प्रशासनाने नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. परंतु हाच संयम आणि असाच प्रतिसाद पुढील सात दिवस औरंगाबादकरांनी दिला तर निश्चितच कोरोनाची साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळेल याबद्दल शंका नाही.

'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत शहराचे अर्थचक्र रुळावर आणून दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. परंतु या काळात दळणवळण वाढले, लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला आणि पुरेशी काळजी न घेतल्यामुळे शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा अक्षरश: उद्रेक झाला.  दररोज दोनशे ते अडीचशेच्या संख्येने रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्हा प्रशासन व नागरिकही हादरून गेले. आता कुठे औद्योगिक क्षेत्रात वर्दळ वाढायला सुरुवात झाली होती, दोन अडीच महिने घरात बसून असलेल्या कामगारांच्या हाताला पुन्हा काम मिळाले होते.

अशावेळी पुन्हा लॉकडाउन करणे कुणालाही परवडणारे नव्हते. परंतु कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या आणि मृतांचे प्रमाण रोखण्यासाठी पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन घ्या, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होऊ लागली होती.  व्यापारी,उद्योजकांचा मात्र याला विरोध होता, काही लोकप्रतिनिधीही  लॉकडाऊन करण्याच्या बाजूने होते तर काहींनी विरोध दर्शवला. शेवटी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी व्यापारी, उद्योजकांची समजूत काढत शेवटच्या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब केले.

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी चार दिवस आधी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन गरजेच्या वस्तूंची जमवाजमव करत कडक लॉकडाऊनला सामोरे जाण्याची तयारी केली होती. त्याचा चांगला परिणाम आज पहिल्याच दिवशी दिसून आला. शहराच्या सर्वच भागांमध्ये नागरिकांनी आपल्या घरातच थांबून प्रशासन व आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

असाच प्रतिसाद कायम हवा..

परंतु नागरिकांचा हा प्रतिसाद तात्पुरता न राहता यापुढील सात दिवसांमध्ये देखील कायम राहणे गरजेचे आहे.तर आणि तरच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात आपल्याला यश येईल आणि कोरोनामुक्तीचे प्रयत्न यशस्वी होतील. कडक लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या गाठली गेली. एकाच दिवसात तब्बल ३३४ कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

आज देखील दिवसभरात १६६ रुग्णांची भर पडली आहे. परंतु कडक लॉकडाऊन मध्ये महापालिका व आरोग्य यंत्रणांनी चाचण्यांची संख्या वाढवत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले टाकली आहेत. नागरिकांनी असाच प्रतिसाद पुढील सात दिवस दिला, तर निश्चितच महापालिका व जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाय योजना प्रत्यक्षात येऊन कोरोनाची संख्या रोखण्यात यश मिळू शकेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com