औरंगाबादः शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणखी एक जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या वतीने राज्यात काही प्रवकत्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून त्यात मराठवाड्यातून एकमेव अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खैरे विरुद्ध दानवे असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर दानवे यांची प्रवक्ते पदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे यांनी गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचे संघटन वाढवल्याचे पहायला मिळाले. शिस्तबद्ध नियोजन, पक्षाच्या ध्येय धोरणानूसार आंदोलनांची आखणी, दिल्लीते गल्ली अशा सगळ्या विषयांवर परखड भूमिका घेऊन पक्षाची प्रसार माध्यमांमध्ये बाजू मांडण्याचे काम प्रवक्ते पद नसतांना देखील अंबादास दानवे जिल्हाप्रमुख म्हणून करत होते. लोकसभा ते ग्रामपंचायत अशा सर्वच प्रकारच्या निवडणुकांमध्ये दानवे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून आपल्या कामाची छाप गेल्या अनेक वर्षात पाडल्याचे पहायला मिळाले.
राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आणि दानवे यांच्या कामाची थेट पक्षप्रमुखांकडूनच वेळोवेळी दखल घेतल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यातील खैरे विरुद्ध दानवे या वादात देखील मातोश्रीवरून गेल्या काही महिन्यात दानवे यांनाच झुकेत माप दिल्याचे देखील दिसून आले होते.
जिल्हाप्रमुख म्हणून संघटना वाढीत केलेल्या चांगल्या कामाची दखल म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना विधान परिषदेवर घेतले. आमदार झाल्यानंतर जिल्हाप्रमुख आणि विधान परिषद सदस्य अशी दुहेरी भूमिका देखील दानवे यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली.
मातोश्रीकडून वेळोवेळी दखल
विधान परिषदेच्या अधिवेशनात मराठवाड्यातील आरोग्य, सिंचन, कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा याशिवाय विकासकामांवर अभ्यासपुर्ण भाषणे करत दानवे यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. संभाजीनगरचा मुद्दा असो की हिंदु्त्वाचा प्रसार माध्यमांसमोर दानवे यांनी शिवसेनेचे भुमिका अनेकदा भक्कमपणे मांडली आहे. त्यांच्या एकूणच कामकाज आणि वक्तृत्वाची दखल घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवल्याचे बोलले जाते.
नुकत्याच झालेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपची साथ घेतल्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्यात वाद झाला होता. हा वाद मातोश्रीपर्यंत देखील पोहचला होता. मात्र यात देखील दानवे यांची सरशी झाल्याचे त्यांच्या नियुक्तीवरून स्पष्ट होते.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.