उस्मानाबादः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यसेवा पुर्व व संयुक्त पुर्व परीक्षेचे केंद्र बदलण्यास विद्यार्थ्यांना संधी मिळावी, अशी मागणी उस्मानाबाद कळंबचे शिवसेना आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जाणे शक्य नाही, त्यांचे शैक्षणिक नूकसान होऊ नये, गैरसोय टाळावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संभाव्य धोक्यामुळे पाच एप्रिल रोजी राज्य सेवा पुर्व परिक्षा तसेच आयोगाच्या अन्य परिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात पुणे, औरंगाबाद, नागपुर, मुंबई यासारख्या अन्य शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गावाकडे परतले आहेत. रेड झोन असलेल्या ठिकाणी ४० हजार परिक्षार्थीनी परिक्षा केंद्राची निवड केली आहे. त्यापैकी ९० टक्के विद्यार्थी हे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. सध्या ते त्यांच्या गावाकडे (जिल्ह्यामध्ये) आहेत.
परिक्षा झाल्यानंतर ते मुळ जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार असल्याने संक्रमण वाढीचा धोका वाढण्याची शक्यता आहे. याचा विचार करुन आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परिक्षार्थींना जिल्ह्याच्या ठिकाणी परिक्षा केंद्र बदलुन द्यावे, व यासाठी आयोगाने संकेतस्थळ सात दिवसासाठी खुले ठेवावे. जेणेकरुन उमेदवारांना आपले परिक्षा केंद्र बदलण्याची संधी उपलब्ध होईल अशी विनंती आमदार घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचे संकट वेगवेगळ्या घटकावर कोसळले असुन त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. त्यातही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐन परिक्षेच्या कालावधीतच या साथीचा प्रादुर्भाव झाल्याने साधारण मोठा कालावधी वाया गेल्याचे दिसुन येत आहे. असे असले तरी या काळात विद्यार्थ्यांना नेमकी परिक्षा कधी होणार याबाबतचाही अंदाज येत नसल्याने अभ्यासातही व्यत्यय येत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी गावाकडे आले असल्याने अगदी त्याच काळात परिक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी रेड झोन भागामध्ये जावे लागणार आहे.
सध्याच्या स्थितीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांची मानसिकता अशा शहरामध्ये जाऊन परिक्षा द्यावी अशी नाही, मात्र अगोदर अर्ज भरताना अशाच शहराचे केंद्र परिक्षेसाठी देण्यात आल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे हे केंद्र बदलण्याची संधी उपलब्ध होण्याची मागणी विद्यार्थ्यांमधुन होऊ लागली आहे. या महत्वाच्या विषयाकडे आमदार घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला हात घातला आहे. आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited By: Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.