मोदींनी शेतकऱ्यांना फसविले; शेट्टींचा घणाघात 
मोदींनी शेतकऱ्यांना फसविले; शेट्टींचा घणाघात 

मोदींनी शेतकऱ्यांना फसविले; शेट्टींचा घणाघात 

बाबा आढाव म्हणाले,"एखाद्या बैलाला जाग येईल, पण फडणवीसांना जाग येणार नाही. मी गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन केले होते, त्यावेळी भेट द्यायला सदाभाऊ खोत आले होते. मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलतो म्हणाले होते. प्रत्यक्षात काय बोलले ते त्यांनाच माहीत.'

पुणे : सत्तेत येण्यापूर्वी लोकसभेच्या प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी "आम्हाला सत्ता द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू, त्यांच्या मालास हमीभाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू,' अशी आश्वासने दिली होती. आजपर्यंत त्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला नसून त्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पुण्यात केली. 

"महात्मा फुले वाडा ते मुंबई राजभवन' आत्मक्‍लेष यात्रेची सुरवात सोमवारी महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी शेट्टी म्हणाले, ""स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अशा विविध मागण्यांसाठी यात्रेला सुरवात झाली आहे. भविष्यात राज्यव्यापी जनआंदोलन उभारले जाणार असून येत्या 30 मे रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांना मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे. कर्जमाफीसोबत सातबारा कोरा करणे आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नाही. या आत्मक्‍लेष यात्रेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असून देखील त्यांनी अद्याप संपर्क साधलेला नाही. यातून या सरकारची संवेदनशून्य मानसिकता दिसून येत आहे,'' अशा शब्दात त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला. 

या यात्रेमध्ये राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सहभागाबद्दल तसेच कथित भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाबाबत विचारले असता, खासदार शेट्टी म्हणाले,"मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते, विविध संघटना सहभागी झाले आहेत. त्यांना सोबत घेऊन ही यात्रा पूर्ण करणार.' 

या यात्रेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले देखील सहभागी झाले आहेत. त्यांच्यावतीने आशिष पाटील म्हणाला, माझ्या वडिलांनी शेतीसाठी काढलेल्या कर्जामुळे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या केली. मात्र तुम्ही आत्महत्या करू नका. व्यसन करू नका,'' असे आवाहन त्याने केले. 

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, लक्ष्मण वडले, पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे, सावकार मदनाईक, आदी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com