खुट्टा घट्ट करण्याचा शेट्टींचा प्रयत्न ! 

ज्या ऊस प्रश्‍नाच्या दरावर श्री. शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आपलेसे केले तो प्रश्‍नही आता ऊस दर नियामक मंडळ, केंद्रीय कृषी मुल्य आयोग व दरासंदर्भात तयार झालेल्या कायद्याने संपुष्टात आला आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या किती ताकदीने मागे राहीले हे सांगता येत नाही. त्यात विकासकामाच्या प्रश्‍नावर त्यांचा मतदार संघातील संपर्क किती हाही संशोधनाचा विषय आहे.
खुट्टा घट्ट करण्याचा शेट्टींचा प्रयत्न ! 
खुट्टा घट्ट करण्याचा शेट्टींचा प्रयत्न ! 

कोल्हापूर :  एखाद्या पक्षात किंवा संघटनेत समांतर यंत्रणा निर्माण झाली की मुख्य व्यक्तीचे महत्त्व आपोआप कमी होते, काहीशी अशीच परिस्थिती "स्वाभिमानी' चे खासदार राजू शेट्टी यांची झाली आहे. ज्यांना विश्‍वासाने पाठिंबा दिला त्यांनीच संघटनेत तर फूट पाडलीच पण श्री. शेट्टी यांच्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांनाही शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने अस्तित्वासाठीच लढावे लागत आहे. 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी श्री. शेट्टी यांनी पुणे ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा सुरू केली आहे. पण गेल्या वर्षभरापासून संघटनेत शेट्टी विरूध्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत असा उघड संघर्ष सुरू झाला आहे. अलिकडे तर या संघर्षाने टोक गाठले आहे. आपल्या संघटनेमुळे राज्यात सरकार आले असा श्री. शेट्टी यांचा दावा असला तरी त्यांच्या "होम पीच' वर त्यांच्या संघटनेची अवस्था काय आहे ? जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या सात वरून दोन वर आली, त्यातही एक सदस्य हे स्वतःच्या हिंमतीवर निवडून आले. शिरोळ पंचायत समितीची हातात असलेली सत्ता गेली. त्यांच्या लोकसभा मतदार संघातील सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघात त्यांचे अस्तित्त्व शून्य आहे. 

पंधरा वर्षापुर्वी ऊस दराच्या प्रश्‍नावरून शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले श्री. शेट्टी अलिकडे मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठीच झगडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यात श्री. खोत यांना मंत्री करून भाजपाने त्यांचे पंख झाटण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. खोत यांना भविष्यात पक्षात घेऊन त्यांनाच श्री. शेट्टी यांच्याविरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचीही रणनिती भाजपाकडून खेळली जाण्याची शक्‍यता आहे. हे डावपेच ओळखूनच श्री. शेट्टी यांनी आत्मक्‍लेश यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या माध्यमातून लोकसभा निवडणुकीतील आपल्या मतदार संघातील स्वतःचा खुट्टा घट्ट करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. 

श्री. शेट्टी यांच्या लोकसभा मतदार संघातील सहापैकी तीन विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे, दोन मतदार संघात भाजापाचे तर एका मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. शिवसेना व भाजपा यांच्यातही विस्तव जात नाही असे मतभेद निर्माण झाले आहेत. सरकारविरोधातच श्री. शेट्टी रस्त्यावर उतरल्याने सरकारचे घटक असलेले भाजपचे शिराळा व इचलकरंजीचे आमदार अनुक्रमे शिवाजीराव नाईक व सुरेश हाळवणकर त्यांच्यासोबत राहतील का नाही ? हा प्रश्‍न आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील हे तर पहिल्यापासूनच त्यांच्या विरोधात आहेत. श्री. शेट्टी यांचे "होम पीच' असलेल्या शिरोळ मतदार संघात त्यांच्याच तालमीत तयार झालेले उल्हास पाटील आमदार आहेत. या दोघांतील मतभेदाने तर टोक गाठल्याने तेही त्यांच्या विरोधात राहतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com