ईव्हीएममुळे भाजपच्या नेत्यांना माज : राज ठाकरे

ईव्हीएममुळे भाजपच्या नेत्यांना माज : राज ठाकरे

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात आज पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर सेल्फी घेत होते. आणि हे असं सगळं करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की ते निवडून येणारच आहेत. यांना एक प्रकारचा माज आला आहे, अशा कठोर शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली.

वर्तमानपत्रात बातम्या आल्या की मला ईडीची नोटीस आली, मला अशी कोणतीही नोटीस आली नाही. मी पत्रकारांना म्हणलं की अशाच धमक्या तुमच्या मालकांना दिल्या जात आहेत, आणि म्हणून तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्ही सत्य मांडू शकत नाही आहात, असा दावा त्यांनी मुंबईतील मेळाव्यात केला.   

भाजपचा वरवंटा ज्यावेळी महाराष्ट्रावर फिरेल, त्यावेळी वरवंटा जात पाहणार नाही, तर मराठी म्हणून सर्वांवर फिरेल, अशी धोक्याची घंटा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईत वाजवली. 

मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात ठाकरे बोलत होते. भाजपच्या फॉलोअर्सना इशारा देताना ठाकरे म्हणाले, की  भाजप त्यांच्या लोकांना सोडत नाही, तर त्यांचा व्हॉटस अॅपवर प्रचार करणाऱ्या फॉलोअर्स कसे सोडेल. ज्या वेळी भाजपचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल, त्यावेळी ब्राम्हण, सीकेपी, माळी, साळी अशी कोणतीही जात पाहणार नाही. हा वरवंटा मराठी म्हणून सर्वांवर फिरेल.   

चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, अनंत गिते आणि शिवाजीराव आढळराव पाटील या शिवसेनेच्या चार ज्येष्ठ खासदारांना प्लॅन करून पाडण्यात आले, असा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. भाजप आणि शिवसेनेने ईव्हीएमच्या मदतीने हे घडवून आणल्याचे त्यांनी या मेळाव्यात सांगितले.

त्यांनी आज ईव्हीएमवर जोरदार हल्ला चढविला. त्यांनी सांगितले की मुस्लिम आणि हिंदूंमध्ये कायम तणाव राहावा म्हणून एमआयएमचे इम्तिआज जलिल यांना निवडून आणण्यात आले. त्यामुळे खैरे यांचा पराभव झाला. अमरावतीत अडसूळ यांच्याऐवजी नवनीत राणा, शिरूरमध्ये आढळरावांच्या ठिकाणी अमोल कोल्हे निवडून आले. हे सारे इव्हीएमच्या करामतीमुळे घडले. या चार ज्येष्ठ खासदारांना मंत्री करायचे नव्हते. त्यामुळे त्यांचा पराभव घडवून आणला. 

कर्नाटकातही असेच झाले. तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काॅंग्रेस आणि जनता दलाला बहुमत मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकल्या. या दोन्ही निवडणुका काही दिवसांच्या अंतराने झाल्या. लोकमतात एवढा फरक कसा पडतो, असा सवाल त्यांनी केला. जे निवडून आले त्यांना कळत नाही की आपण विजयी का झालो आणि जे पराभूत झाले त्यांनाही आपल्या पराभवाचे कारण कळत नाही. इव्हीएमच्या चिप या अमेरिकेत बनविल्या जातात. त्यामुळे या साऱ्या प्रक्रियेविषयी संशय आहे. त्यामुळे या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची मागणी आपण केली पाहिजे. ईव्हीएमच्या विरोधातील मोर्चा पूरामुळे स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com