सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम - राधाकृष्ण विखे पाटील

सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम - राधाकृष्ण विखे पाटील

अकोला : एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळाने हवालदिल झाला असताना राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारकडून जाचक निकष लादून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांची चेष्टा करीत असून केंद्र व राज्यातील भाजप सरकार जुलमेबाज सरकार आहे. शेतकऱ्यांना दुःखातून सावरण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस तुम्ही पंधरा वर्षात काय केले आणि आम्ही साडेचार वर्षात किती विकास कामे केली, चला होऊन जावू द्या सामना अशी वल्गना करीत आहेत. मुख्यमंत्री महोदय जरा सबर करो, तुमच्याशी सामना तर होणार आहे, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. 

दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी गुरूवार (ता.15) बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाले, की राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल झाला आहे. मात्र, राज्य सरकार दुष्काळी भागातील शेतकऱ्यांमध्ये मध्यम दुष्काळ, तीव्र दुष्काळ असा भेदभाव करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कॉंग्रेसने 24 पासून संघर्ष यात्रा काढण्याचे जाहीर केले. त्या भितीनेच मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ सदृष्य परिस्थिती असल्याचे जाहीर केले. 

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांचा मी दौरा करून तेथील परिस्थिती जाणुन घेतली तर अनेक तालुके, मंडळाना वगळण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लातूर भागात सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटले. सरकार पीक कापणीचे प्रयोग करीत असून जेथे सोयाबीनचा 80 टक्के पेरा आहे ते क्षेत्र वगळून तेथे मुग आणि उडीदाचे क्षेत्र दाखवून राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेने आपल्या अक्कलेचे दिवाळखोरी निघाल्याचे दाखवून दिले आहे. या सगळ्या प्रकारावरून सरकार शुद्धीवर नसल्याचे दिसत असल्याचा 
आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

पीक विमा योजनेत मोठा घोटाळा झाला असून सरकार शेतकऱ्यांकडून पैसा घेऊन विमा कंपन्यांचे भलं करीत आहे. राफेल घोटाळ्यापेक्षाही पीक विमा योजनेचा घोटाळा मोठा असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. जलयुक्त शिवार योजनेतही मोठे घोटाळे झाले असून सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचे कंत्राटदारांशी लागेबांधे असून जलयुक्त शिवारची अनेक गावामध्ये बोगस कामे दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी हडपण्यात आल्याची टीका विखे पाटील यांनी केली. 

शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस आम्ही पंधरा वर्षात काय केले? असे म्हणत आहेत, चला होऊन जावू द्या सामना अशी वल्गना करीत आहेत. मी त्यांना एकच म्हणेल, मुख्यमंत्री महोदय जरा सबर करो, तुमच्याशी आमचा सामना तर होणारच आहे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com