निलम गोऱ्हेंचा तोडगा मान्य नाही : विखे पाटील

पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस्त विधानामुळे केवळ शिर्डीकरच नाही, तर देश विदेशातील कोट्यवधी साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
radhakrishna vikhe on nilam gorhe
radhakrishna vikhe on nilam gorhe

शिर्डी : "साईबाबांचे जन्मस्थळाबाबत शिर्डीकरांनी पुकारलेल्या 'बंद'ला आपला पूर्ण पाठिंबा आहे. याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्याच्या वतीने सुचविलेला त्रीसदस्यीय समिचीचा तोडगा आम्हाला मुळीच मान्य नाही. मुख्यमंत्र्यानी माहिती घेऊन विधान करायला हवे होते. ते न केल्याने ही परिस्थितीत उद्‌भवली,'' अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस्त विधानामुळे केवळ शिर्डीकरच नाही, तर देश विदेशातील कोट्यवधी साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. हे वादग्रस्त विधान ते मागे घेत नाहीत, तोपर्यंत या वादातून तोडगा निघणार नाही, असे विखे पाटील यांनी सांगितले.

"मराठवाड्यातील पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असून, त्याच्या विकासासाठी राज्य सरकारने शंभर कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे,'  असे विधान मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्यानंतर साईबाबांची समाधी असलेल्या शिर्डीत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन उद्या (रविवारी) 'शिर्डी बंद'चे आवाहन केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आमदार विखे पाटील यांनी आज येथे येऊन निवडक ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनी पुकारलेल्या 'बंद'ला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी आपले वादग्रस्त विधान मागे घेणे हा या वादावरील एकमेव तोडगा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

विखे पाटील म्हणाले, "हे आंदोलन ग्रामस्थांनी पुकारले. या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान मागे घेतले नाही, तर कदाचित ग्रामस्थ बेमुदत आंदोलन पुकारतील. ब्रिटिशांनी साईबाबांच्या हयातीत त्यांचा जात व धर्म शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. ऋषीचे कूळ आणि नदीचे मुळे शोधू नये. साईसमाधीला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा वाद अचानक निर्माण करण्याचे काय कारण? यापूर्वी शंभर वर्षांत पाथरीकरांचे 29 पुरावे कुठे गेले होते. त्यांच्या दाव्याला सरकारने पाठिंबा देऊ नये. देश-विदेशात शेकडो साईमंदिरे आहेत. साईमंदिर या नात्याने पाथरी येथील साईमंदिराला विकासनिधी देण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र ती साईजन्मभूमी आहे, या दाव्याला ग्रामस्थांचा व करोडो साईभक्तांचा विरोध आहे. पाथरीकरांनी या वादाचा संबंध शिर्डीतील अर्थकारणाशी जोडण्याचा बेतालपणा करू नये. मुख्यमंत्र्याची कुणी दिशाभूल केली किंवा कसे हे ठाऊक नाही. आपला मुख्यमंत्र्यांना विरोध नाही. त्यांच्या वादग्रस्त विधानाला विरोध आहे. साईसंस्थानने साईचरित्र ग्रंथाच्या मूळ प्रतीवरून या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करावे. या ग्रंथात कुठेही साईजन्माचा उल्लेख नाही. बाबांनी त्यांच्या हयातीत कधी त्याबाबत विधान केलेले नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com