पुण्याच्या एसपींचे काम चांगले : गृह राज्यमंत्री केसरकर

कोरेगाव भीमा येथील दंगलीला जबाबदार कोण, यावर आता वाद झडू लागला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांवर अपुऱ्या बंदोबस्ताचा आरोप ठेवला आहे. तसेच पुण्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) डाॅ. सुवेझ हक यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याउलट गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी एपींचे काम चांगले असल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली.
पुण्याच्या एसपींचे काम चांगले : गृह राज्यमंत्री केसरकर

मुंबई : पुणे जिल्ह्यातील वढू आणि सणसवाडी येथे घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांनी काही केले नाही असे म्हणणे चुकीचे आहे. पुण्याचे एसपी या घटनेत चांगले काम करत असून आयजी विश्वास नांगरे-पाटील देखील तिथे ठाण मांडून आहेत, असे स्पष्टीकरण गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

भारीप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगावची दंगल ही पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला होता. तसेच याबाबत पुण्याचे एसपी सुवेझ हक यांना सोडणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला होता. यावर केसरकर यांनी हे स्पष्टीकरण दिले. केसरकर यांनी दोन जानेवारीला प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व माहिती घेतली होती.

मंत्रालयात आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर सविस्तरपणे मुद्दे मांडले. ते म्हणाले, `` या घटनेत आणि बंदच्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून कुठेही बळाचा वापर केला नाही. तसेच पोलिसांमुळेच मोठी अनुचित घटना घडली नाही. कोरेगाव येथील लढाईला यंदा 200 वर्षे पूर्ण झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट लोकं आले होते. मात्र चोख बंदोबस्तामुळे कार्यक्रमस्थळी कुठलाही दंगा झाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणाचा आरोप योग्य नाही.

सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे पुढे या प्रकाराला वेगळे वळण लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वढु बुद्रुकमध्ये 100 टक्के शांतता असून येथे बाहेरच्या लोकांनी बॅनर लावले असल्याचे केसरकर म्हणाले. ते म्हणाले की गावातील दलित बांधवांचे देखील म्हणणे की आम्ही बॅनर लावले नाहीत. त्यांचीही सामंजस्यांची भूमिका आहे. येथील छत्री तोडणाऱ्या 9 लोकांवर एट्रोसिटी दाखल झाली आहे. मात्र 50 जणांवर हा गुन्हा दाखल झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरले. तसेच या गोंधळामध्ये मृत झालेला युवक दलित असल्याचीही अफवा सोशल मीडियातून फिरल्यामुळे स्थिती गंभीर झाली असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

या घटनेत दोन्ही गटांकडून दगडफेक झाली असल्याचे सांगत संबंधित सर्व दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. कोरेगावला दलित युवकाचा मृत्यू झाला, अशी अफवा पसरवण्यात आली मात्र हा मृत दलित व्यक्‍ती नसल्याचे केसरकर यांनी दिली. 

औरंगाबादला प्लास्टिक बुलेटचा वापर 

औरंगाबादला दीड हजाराचा मॉब आल्याने पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून प्लास्टिक बुलेटचा वापर करावा लागला असल्याचे केसरकर यांनी सांगितले. या घटनेत पोलीस देखील जखमी झाल्याचे केसरकर म्हणाले. चंद्रपूरला माजी आमदार शाम घुडे यांच्या कार्यालयावर हल्ला झाला असून नांदेडला पोलिसांच्या गाडया फोडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये मोर्चे निघाले, रस्ता रोको केले पण पोलिसांनी लगेच वातावरण स्थिर केल्याचा दावा त्यांनी केला. पवई पोलीस स्थानकात दगडफेक होऊन 1 पीआय, 2 पोलीस शिपाई जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. घाटकोपर, चेंबूर, छेडानगर, विक्रोळी, रमाईनगर या भागासोबत दादर, भोईवडा, वरळी काही ठराविक युवकांच्या समूहांनी बंद करण्यासाठी घोषणाबाजी केली आणि या ठिकाणी काही काळ तणाव असल्याचे त्यांनी सांगितले.
 आधीची बातमी
पुणे एसपींना अजून सोडलेले नाही : प्रकाश आंबेडकर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com