
पिंपरी : बाळा तथा संजय भेगडे (Bala Bhegade) हे माजी राज्यमंत्री तथा मावळचे भाजपचे (BJP) माजी आमदार आहेत. तरीही त्यांचा विद्यमान लोकप्रतिनिधींप्रमाणे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao-Patil) यांच्यासारखा जनतेच्या कामासाठी पाठपुरावा सुरुच आहे. आता, तर राज्यात सत्ताबदल होऊन त्यांच्या पक्षाची सत्ता आल्याने ते अधिक आक्रमक झाले आहेत. त्यातून त्यांनी आज (ता.२९ ऑगस्ट) मावळच तहसीलदार मधूसुदन बर्गे यांना धारेवर धरले. नेमस्त स्वभावाचे भेगडे प्रथमच एवढे संतापलेले दिसले. सरकार बदललंय, आता कामाची पद्धतही बदला आणि सुधरा, अन्यथा तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Bala Bhegade Latest News)
अन्न सुरक्षा योजनेत रेशनवर धान्य न मिळत नसलेले मावळातील आदीवासी, लोणावळा येथील वेट `अॅन्ड जॉय वॉटर पार्क` मधून कामावरून काढलेले स्थानिक तरूण आणि सातबाऱ्यावर महसूल विभागाने दुसऱ्याचेच नाव लावलेल्या शेतकऱ्यांना घेऊन भेगडे हे आज मावळ तहसीलदार कार्यालयावर धडकले आणि त्यांनी तहसीलदारांना याप्रश्नी धारेवर धरले. त्यांना कडक इशारा दिला.
तहसीलदार कार्यालयात गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या दलालांमुळे (पगारी एजंट) स्थानिक त्रस्त झाले आहेत. त्यातून हे कार्यालय जनतेचे राहिले नसल्याची तोफ त्यांनी डागली. या पगारी एजंटांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांचे तहसील कार्यालयातील येणे उद्यापासून थांबले पाहिजे, असा कडक इशारा त्यांनी दिला. नाही, तर त्यांच्याबरोबर प्रशासनालाही सरळ करू, असा दम त्यांनी भरला.आदीवासींना रेशन मिळत नाही, मग त्यांचे धान्य जाते कुठे, अशी विचारणा करीत सबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
तालुक्यातील आदीवासींसह तहसीलदार कार्यालयात येणाऱ्यांना दोन- दोन तास बाहेर थांबवून ठेवू नका, त्यांना आत घेऊन त्यांची कामे मार्गी लावा अथवा तुम्ही बाहेर जा. ते तासनतास बाहेर उभे राहिलेले सहन करणार नाही. नाही, तर मी माझ्या पद्धतीने कार्यवाही करेन. सरकार बदललंय, आता तुम्हीही कामाची पद्धत बदला, सुधरा, असा दमही त्यांनी भरला. मावळातील काही शेतकर्यांच्या सातबाऱ्यांवर इतरांची नावे महसूल विभागाने घुसडवली आहेत. ती आठ दिवसात दुरुस्त केली नाहीत, तर तहसील कार्यालयालाच टाळे ठोकेन, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. कॅनल बुजवून वेट अॅन्ड जॉय हे वॉटर पार्क उभारणाऱ्या मालपाणी या उद्योजकाने स्थानिक २५-३० तरुणांना कसलेही कारण न देता कामावरून काढून टाकले आहे. त्यांना कामावर घेतले नाही, तर हे पार्कच येत्या १ तारखेला बंद करू,असा इशाराही संतप्त भेगडेंनी यावेळी दिला.
दरम्यान, आमच्या अखत्यारीतील व अधिकारातील आमदार भेगडेंनी उपस्थित केलेले प्रश्न व मागण्यांवर नियमानुसार कार्यवाही करू, दुसऱ्या विभागाचे प्रश्न त्यांच्याकडे पाठवू,असे तहसीलदार बर्गे यांनी यानंतर सरकारनामाला सांगितले. वॉटर पार्कसाठी कॅनॉलमधून बेकायदेशीरपणे पाणी उचलले जात असल्याच्या उपस्थित झालेल्या मुद्याबाबत पाटबंधारे विभागाला कळवू, असे असे ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.