'न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणाऱ्या आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊ!'

Vishwambar Chaudhary : गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाविरोधात विश्वंभर चौधरींचा सत्याग्रह आंदोलन
Ganesh Visarjan News
Ganesh Visarjan NewsSarkarnama

पुणे : दोन वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनच्या सावटानंतर यंदा राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धामधूमीत आणि कसल्या निर्बंधमुक्त वातावरणात पार पडले. काल गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गणपती विसर्जनही मोठ्या जल्लोषात पार पडले. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यापुढे सगळे सण आणि उत्सव दणक्यात, कसल्याही निर्बंधाविना साजरा होणार, असे जाहीर केले होते. यामुळे गणेशोत्सव मुंबई, पुण्यासह राज्यभरात मोठ्या दणक्यात साजरा झाला. पुण्यात विसर्जन मिरवणुका दुसऱ्या दिवशी सायंकाळ पर्यंत संपलेली नव्हती. मिरवणुकी दरम्यान मोठ - मोठ्या ध्वनीक्षेपाच्या भिंती उभे करून, अनेक गणपती मंडळांनी आवाजाच्या डेसिबल मर्यादा ओलांडून प्रचंड ध्वनीप्रदूषण केले. मिरवणुकी दरम्यान उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्रास धाब्यावर बसवले गेले, असे आक्षेप घेण्यात आले आहेत. यावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी आक्षेप नोंदवला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपण पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात जाऊन सत्याग्रह करणार असल्याचे चौधरी यांनी म्हंटले आहे.

विश्वंभर चौधरी यांनी नागरीकांना आवाहन करत आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, "सोमवारी सकाळी अकरा वाजता आपण पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात जाऊ. त्यांना गुलाबाचं फुल देऊ. नंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनाही गुलाबाचं फूल देऊ. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आज सर्रास धाब्यावर बसवले गेले आणि ज्यांच्यावर कायदे पाळण्याची जबाबदारी आहे ते अधिकारी मूक दर्शक बनून राहिले आहेत, अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांचा वाली कोण? गणेशोत्सवात आणि दोन दिवस चाललेल्या मिरवणूकीत आवाजाचा त्रास झालेल्या सगळ्या पुणेकर नागरिकांनी कृपया यावे. हा पूर्णतः शांतता आणि अहिंसक मार्गानं केला जाणारा सत्याग्रह आहे. शिंदे- फडणवीस मतांसाठी काहीही करतील, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी, मनपा आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे- फडणवीसांची आणि मंडळांची चाकरी करावी की लोकांचा पगार घेतो म्हणून सामान्य लोकांची ? हा खरा प्रश्न आहे. आपण नोकरशाहीला प्रश्न विचारले पाहिजेत. तुमचा पगार शिंदे- फडणवीस नाही, आम्ही करतो हे नोकरशाहीला ठणकावून सांगायची वेळ आली आहे."

Ganesh Visarjan News
वाबळेवाडी ग्रामस्थ आक्रमक : सीईओ आयुष प्रसादांवर कारवाई झालीच पाहिजे

"जे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पुढील महिनाभरात भेटायला जातील त्यांनी या दोघांनाही प्रत्येकी तीन गुलाबाची फुलं द्यावीत ही विनंती. एक ज्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खेळखंडोबा झाला त्या विद्यार्थ्यांच्या वतीने, दुसरा गुलाब त्या पेशंट्सच्या वतीने ज्यांना घरात आणि रूग्णालयात आवाजाचा जीवघेणा त्रास झाला, आणि तिसरा गुलाब त्या वृद्धांच्या वतीने ज्यांना या दहा दिवसात आयुष्य नकोसं झालं होतं डीजेमुळे. गांधीगिरी करा. विवेक थोडाफार जागा झाला तर फायदाच आहे," असेही चौधरी म्हणाले.

दरम्यान पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी सायंकाळ पर्यंत चाललेली होती. विसर्जन मिरवणूकीचा एकूण कालावाधी ३१ तासांचा होता. परंतु पुणे पोलिसांच्या दाव्यानुसार २९.३० तासात मिरवणूक संपल्याची माहीती आहे. यावेळी गणेश मंडळांकडून ध्वनीप्रदूषणाबाबतचे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्रास धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. मिरवणुक परीसरात अनेक विद्यार्थ्यांचे आणि परिक्षार्थींचे वास्तव्य असते. या परिसरात पूना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटलसहित अनेक छोटे मोठे हॉस्पिटल येतात. यामुळे ध्वनीप्रदूषणाचा परिणाम हॉस्पिटल्स व यामधील रूग्णांना झाला. मिरवणुक परीसरातील अनेक वृद्ध आणि ज्येष्ठ नागरीकांना डिजेच्या दणदणाटामुळे प्रचंड त्रास झाला आहे, असा आक्षेप नोंदवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com