
Indapur News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी घटना असून मारहाण करणाऱ्या पोलीस प्रशासनावर तातडीने कारवाई होणे, गरजेचे असल्याची भुमिका माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatraya Bharne) यांनी घेतली.
मराठा समाजाला आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षण समितीचे समन्वयक मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्याठीकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून याबाबत भरणे यांनी परखड भूमिका घेतली आहे.
भरणे म्हणाले, वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये प्रत्येक घटकाला आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. यापूर्वी मराठा समाज बांधवांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचे मोर्चे शांततेत काढले. त्यांच्या शिस्तीची जगाने नोंद घेतली आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला कोणतेही गालबोट लागणार नाही, याची काळजी मराठा समाज घेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जालन्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या हजारो मराठा समाज बांधवांवर लाठीचार्च करुन प्रशासनाने त्यांचे आंदोलन मोडीत काढण्याच्या प्रयत्न केला.
हा प्रकार अत्यंत चुकीचा असून यामध्ये शेकडो बांधव जखमी झाले आहेत. या घटनेचा भरणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलून घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या त्वरित निलंबनाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.