
पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर लावण्यात आलेल्या शिलालेखावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या नावाबाबत सांगण्यात येणारा इतिहास चुकीचा असल्याचे सांगत संभाजी ब्रिगेडने हा शिलालेख काढण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याआधीदेखील या किल्ल्याचे नाव सिंहगड होते, असा उल्लेख या शिलालेखात करण्यात आला आहे. या माध्यमातून चुकीचा इतिहास लोकांसमोर जात असल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगडचे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी घेतला आहे.
सिंहगड किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकण्याआधी कोंढाण्याचे नाव सिंहगडच होते. त्याचे पुरावे असल्याचा उल्लेख शिलालेखात करण्यात आला आहे. अशाप्रकारे गडावरील शिलालेखातच चुकीची माहिती दिली जात असेल तर नव्या पिढीतील तरूणांपर्यंत चुकीचा इतिहास जाईल, असे कामठे यांनी म्हटले आहे.
हिंदी-मराठी चित्रपटांच्या माध्यमातून सिंहगडाचा इतिहास नव्या स्वरूपात देशभर पोचत आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकून घडविलेला इतिहास विविध माध्यमातून नव्या पिढीसमोर जात असताना त्यांना चुकीचा इतिहास सांगितला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेने हा शिलालेख लावला आहे. शिलालेखात सभासद बखरीचा उल्लेख करण्यात आला आहे. ऐतिहासिक संदर्भ देऊन नव्या पिढीला चुकीचा इतिहास शिकविला जाऊ नये, यासाठी महापालिकेच्या संबंधित आधिकाऱ्यांनी यात तत्काळ दुरस्ती करावी, अशी मागणी कामठे यांनी केली आहे.
शिलालेखात दुरूस्ती करतानाच संबंधित आधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी. शिलालेख तयार करताना कुणी हे जाणीवपूर्वक केले आहे का याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच तत्काळ दुरस्ती झाली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगडेच्यावतीने आंदोलनाचा इशारा कामठे यांनी दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.