पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. पावसामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचे कारण मनसेकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील डेक्कन येथील नदीपात्रात ही सभा घेण्याचे नियोजन मनसेने केले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. पण नंतर मनसेनेचे पावसाचे कारण देत ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मात्र आता रद्द झालेली ही सभा दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार असून बंदिस्त सभागृहात ही सभा पार पडणार आहे. रविवारी २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रिडा मंच इथे ही सभा होणार आहे. तसेच यासंदर्भातील अधिक माहिती राज ठाकरे ट्विट करुन वेळोवेळी मनसैनिकांना आणि महाराष्ट्राला देतील अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.
मात्र या सभेच्या निमित्ताने दोन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले एक आव्हान राज ठाकरे यांनी स्विकारलं असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी नाशिकमधील सभेत बोलताना राज ठाकरे यांना दिवसा सभा घेण्याचे आव्हान दिले होते. त्यानुसार आता राज ठाकरे सकाळी १० वाजता ही सभा घेणार आहेत. त्यामुळेच अजितदादांचे आव्हान राज ठाकरेंनी स्विकारले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
'आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दूपारी सभा घेतली का असा सवाल अजित पवार यांनी केला होता. कधी कष्ट घेतले आहेत का? यांची सभा कधी संध्याकाळी. उगीच लोकांची दिशाभूल करायची, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकीय स्वार्थापोटी समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरु आहे. चांगले वातावरण गढूळ करण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे', असे अजित पवार म्हणाले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.