
Bhima Koregaon Shouryadin : दरवर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन साजरा केला जातो. पण या शौर्य दिनावर आणि त्या दिवशी होणाऱ्या शासकीय कामांवर बंदी घालावी, तेथील विजय स्तंभ काढून टाकावा, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी केली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच, १ जानेवारीला भीमा कोरेगावला जाऊन शौर्य दिनाला विरोध करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या मागणीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्याची मागणी केली आहे. "करणी सेनेची ही मागणी चुकीची आहे. त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ साली स्वाभिमानासाठी आणि जाती अंतासाठी पेशव्यांमध्ये आणि महार सैनिकांमध्ये युद्ध झाले. या युद्धामध्ये महार सैनिकांचा विजय झाला. यामुळे हा भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे अजय सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी.” अशी मागणी खरात यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी यांच्याकडे केली आहे.
याशिवाय, १ जानेवारीला आपण भीमा कोरेगावला जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार असल्याचं सांगितलं आहे. “भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचं प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीला तिथे जाऊन आमच्या पूर्वजांना मानवंदना देत होते. तेव्हा सुद्धा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्याची कोणी हिम्मत केली नव्हती, होय, आम्हीही तिथे जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार असंही त्यांनी सांगितलं आहे.” असं ट्विट करत आव्हाड यांनी सेंगर यांना सुनावले आहे.
अजय सेंगर यांनी साम' वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केलं होतं. “इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा शौर्य दिन कसा काय साजरा होऊ शकतो. असा सवाल सेंगर यांनी उपस्थित केला आहे. तसेच गद्दारांचा शौर्य दिन साजरा होऊ नये यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, राज्य सरकारने भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर बुलडोझर चालवावा, अशी मागणी करणार आहोत, असही सेंगर यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर ही जातीय लढाई नव्हती तर ही इंग्रजांविरोधात केलेली लढाई होती. याला जातीय स्वरुप देऊ नये, अशी मागणी त्यांनी देशातील समस्त हिंदू, बौद्धांना केली आहे.
करणी सेनेकडून १ जानेवारी रोजी श्रद्धांजली सभा घेणार आहेत. इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा भारतीयांनी उदो उदो करु नये, अस म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली राजकीय चूल पेटवण्यासाठी या चकमकीला जातीय स्वरुप दिल्याचा आरोपही सेंगर यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.