
पिंपरी : शिरुर (जि.पुणे) मधून खासदारकीची हॅटट्रीक केलेले शिवसेनेचे (Shivsena) उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुणे शहर मतदारसंघातून लढवावी, असा प्रस्ताव पक्षाचे नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकताच (ता.५ जुलै) आढळरावांना दिला. त्यानंतर मतदारसंघात काहूर उठले असून वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हेच पुन्हा २०२४ ला शिरूरमधून उमेदवार असतील, हे ही जवळपास नक्की झाले आहे. तसेच या निवडणुकीत आघाडी राहण्याचे संकेतही मिळाले आहेत. 'सरकारनामा'शी बोलताना राऊत यांनी केलेल्या विधानातून त्याला काल दुजोरा मिळाला. शिरूरचे तीनवेळचे खासदार राहिलेल्या आढळरावांना पुणे शहरातून लढण्यास आपण का सुचविले आहे, असे विचारले असता विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्याचा प्रघात आहे. त्यातूनच आढळरावांना पुणे शहरातून लढण्याची सूचना केल्याचे राऊतांनी सांगितले.
राऊत यांच्या शब्दाला शिवसेनेत मोठे वजन आहे. त्यामुळे ते बोलतात तसे पक्षात घडते. त्यांची सुचना हा अप्रत्यक्ष आदेशच असतो. त्यामुळे तो पाळावा लागतो. मात्र, संपूर्ण शिरूर (अगोदरचा खेड) मतदारसंघाची खडानखडा माहिती असलेले आढळराव नवख्या मतदारसंघातून (पुणे शहर) लढण्याचा धोका पत्करण्याची शक्यता कमी वाटते आहे. पुणे महापालिकेत भाजप सत्तेत होती. पुणे शहरात त्यांचाच खासदार (गिरीश बापट) आहे. शहरात बहूतांश आमदार त्यांचे आहेत. भाजपची ही ताकद पाहता आढळराव हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागतील ही शक्यता सुतराम दिसत नाही. त्यामुळे २०२४ ला भाजपची ऑफर आली, तर ते शिरूरमधूनच लोकसभा लढतील, अशी चर्चा ऐकायला मिळाली.
३ जुलैला आढळराव यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याची बातमी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात आली अन् शिरूरमध्येच नाही, तर राज्यात मोठी खळबळ उडाली. नंतर, ही कारवाई नजरचुकीने झाल्याचा खुलासा करण्यात आला. त्याबद्दल माफी मागितली गेली. एवढेच नाही, तर नाराज झालेल्या आढळरावांना ५ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे (पश्चिम) मुंबई येथील आपल्या 'मातोश्री' निवासस्थानी बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पुणे शहर मतदारसंघातून लढण्याची सुचना करण्यात आली. तसेच त्यांना काही महिन्यांपूर्वी सांगितले गेले होते, असे राऊत म्हणाले. मात्र, आढळराव हे `शिरूर`वर ठाम आहेत. तीनवेळा तेथून ते निवडून आल्याने हा मतदारसंघ त्यांना सोईचा आहे. तेथून पुन्हा निवडून येण्याची त्यांना खात्री वाटते आहे. त्यामुळे आगामी लोकसभा ते कुठून लढतात याविषयी मोठे औत्सुक्य आतापासूनच निर्माण झालेले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.