
Maval APMC Election : पुणे जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलचा दणदणीत पराभव झाला. तर महाविकास आघाडीच्या पॅनेलने १७-१ असा निर्विवाद विजय प्राप्त संपादन केला. दरम्यान, फक्त एक जागेसाठी तडजोड न करता भाजपमुळे या निवडणुकीचा घाट घातल्याचा आरोप होऊ लागाला आहे. या पार्श्वभूमिवर विजयी महाविकास आघाडी पॅनेलचे प्रमुख राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
मावळात बाजारच (मार्केटयार्ड) नसल्याने मावळ बाजार समितीची (Maval APMC) निवडणूक आतापर्यंत होतच नव्हती. तालुक्यातील सर्व पक्ष जागा वाटून घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. यावेळीही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाल्याचे भाजप आणि राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. मात्र फक्त एका जागेसाठी चर्चा फस्कटल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे प्रतिस्पर्धी भाजप (BJP) पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलने १८ पैकी सात जागांची मागणी केली होती. तर त्यांना सहा जागा देऊ करण्याची तयारी सहकार पॅनेलने दर्शवली होती. मात्र हा निर्णय भाजप पुरस्कृत पॅनेलने फेटाळाला.
आता या दोन्ही पॅनेलचे प्रमुख मावळचे आजी-माजी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आणि बाळा भेगडे यांनी निकालानंतर या चर्चेला दुजोरा दिली आहे. एका जागेवरून तडजोड झाली नसल्याने मावळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली नाही. यानंतर नियमानुसार या बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
दरम्यान, मावळ बाजार समितीतून भाजपचा बाजार उठल्याची कडवट प्रतिक्रिया समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक निकालावर आमदार शेळकेंनी दिली. शेळके म्हणाले, "ही संघर्षाची व अटीतटीची निवडणूक असल्याचे भाजपने भासवले. पण, ती तशी नव्हती. सहकारातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका होती. त्यासाठी पाच-सहा जागा देण्याची आमची तयारी होती."
शेळके यांनी नाव न घेता भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडेंवर (Bala Bhegde) टीका केली. शेळके म्हणाले," ही निवडणूक होण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काहींना आपले तालु्क्यात अस्तित्व असल्याचे सिद्ध करायचे असेल. त्यासाठी काहीतरी मिळविण्यासाठी ही निवडणूक जाणीवपूर्वक बिनविरोध होऊ दिली नाही. भाजपला पुढील काळात उमेदवारही मिळणार नाहीत, हे या निकालाने दाखवून दिले आहे."
दरम्यान, जनतेचा कौल असल्याचे सांगत बाजार समिती निवडणुकीचा निकाल मान्य असल्याचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले. भेगडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच हा पराभव झाला असला, तरी भविष्यात तालुक्यातील सहकारी संस्थांना राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून बळ देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रस्ताव आला होता. पण, तो आमच्या समितीला मान्य झाला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.