सोलापूर : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी एकत्रित (दोस्ती करत) येत राजकीय चमत्कार घडविला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्ता स्थापन करत भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवले. मात्र अनेक जिल्ह्यात या पक्षात ताळमेळ नसल्याचे दिसते. सोलापूर जिल्ह्यात आजही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असा संषर्घ दिसून येत आहे.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून सोलापूरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आहे. सोलापूरसारखा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला जिल्हा भरणे यांना मिळाल्याने राष्ट्रवादीतील गटबाजी आवरता आवरता पालकमंत्री भरणे यांना कॉंग्रेस आणि शिवसेनेचीही डोकेदुःखी सहन करावी लागत आहे. पालकमंत्री आमच्याकडे बघत नाहीत, राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमचे प्रश्न सुटत नसल्याच्या तक्रारी सोलापूरच्या शिवसैनिकांनी केल्यानंतर मातोश्रीवरुन त्याची दखल घेण्यात आली.
शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या विधानसभा मतदार संघासाठी आमदार सुनील प्रभू यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी तर आमदार प्रणिती शिंदे यांना थेट सोलापूरचे पालकमंत्री करण्याची मागणी त्यांचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसचा सूर अद्यापही जुळालेला नसल्याचे समोर आले आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व महापालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांपूर्वी हे चित्र स्पष्ट झाल्यास आणि राज्यातील दोस्ती सोलापुरातही झाल्यास महाविकास आघाडीला त्याचा अधिक लाभ होईल.
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपच्या मदतीने झाला. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आजही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपेक्षा जास्त भरवसा भाजपवर ठेवतात, त्यांच्यासोबत राहतात. राज्यातील शिवसेनेचे नवीन मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी व कॉंग्रेस सोलापूर जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेच्या भाजप प्रेमाबद्दल फक्त हातावर हात ठेवून बघताना दिसत आहे. सोलापूरची शिवसेना याबद्दल काहीही बोलायला तयार नाही. महाविकास आघाडीत बिघाडी केली म्हणून सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
महापालिकेत भाजपकडे एकहाती काठावरचे संख्याबळ आहे. राज्यात महाविकासचा प्रयोग झाल्यानंतर महापालिकेत एमआयएमच्या मदतीने अस्साच प्रयोग होऊ शकतो, याची सुरवातीला कॉंग्रेस नेत्यांना कल्पना आली होती. या प्रयोगातून शिवसेना व विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनाच अधिकचा लाभ होत असल्याची खात्री कॉंग्रेस व एमआयएमची झाल्याने त्यांनी महापालिकेत या प्रयोगाचा फक्त विचारच केला. प्रत्यक्षात कृती केलीच नाही. महापालिकेतील शिवसेनेला आजही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपेक्षा भाजप जवळची वाटत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.