
पुणे : सकाळ उद्योग समूहाच्या 'ब्रँडस ऑफ महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी सूचक वक्तव्य केलं. या कार्यक्रमात अतिशय लीलया पहिल्यांदा सुशिलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) व त्यानंतर मी आणि पुन्हा शिंदे, पवार आणि माझ्या हस्ते उद्योजकांना गौरविण्यात आलं. त्यामुळे मला असे वाटते, राजकारणात असे होत असते. अशी समृद्ध प्रक्रिया महाराष्ट्रात पाहायला मिळतेय, अशी राजकीय कोटी फडणवीसांनी केली.
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने 'ब्रँडस ऑफ महाराष्ट्र' या उपक्रमांअंतर्गत राज्यातील उद्योजकांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, नारायण राणे (Narayan Rane), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पवारसाहेब, शिंदेसाहेब यांचे काम, कर्तुत्व मोठे आहे. त्यांच्या सोबत या कार्यक्रमात उपस्थित राहताना आनंद वाटतोय, असंही फडणवीस म्हणाले. पण त्यांच्या राजकीय कोटीने यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसेच अनेकांनी टाळ्या वाजवून दादही दिली. दरम्यान या कार्यक्रमात मागील काही दिवसांनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि फडणवीस हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.
अनुभवी नेत्यांनी चुकेल त्यांचे कान धरावेत
नारायण राणे यांनीही पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला. मिळालेली सत्ता ही कोणा एका कुटुंबियासाठी नसून महाराष्ट्रातील 12 ते 13 कोटी जनतेसाठी आहे. मी मंत्री झाल्यानंतर राज्यात उद्योग यावेत, म्हणून अनेक प्रयत्न केले. पत्र पाठवलं पण उत्तर नाही. अनुभवी नेत्यांनी देखील चुकेल त्यांचे कान धरले पाहिजेत तरच आपण राज्याचे, देशाचे नेते आहोत याचे समाधान वाटते, असा निशाणा राणे यांनी साधला.
राणे म्हणाले, महाराष्ट्र म्हटल्यानंतर अंगात वेगळीच उर्जा संचारते. अंगात रक्त सळसळते. अशा या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो याचा मला अभिमान वाटतो, गर्व वाटतो. पण मुख्यमंत्रीपद हे अभिमान आणि गर्वाने मिरवायचे नाही तर जबाबदारीचे आहे. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे. प्रगतशील राज्याची यादी येते त्यात महाराष्ट्र अग्रक्रमाने आहे.
अलीकडील काळात राज्यात उद्योग आहेत पण उद्योगात राज्य कुठे आहे याचा प्रश्न पडतो. वीज नाही, इफ्रास्ट्रक्चर नाही, कायदा सुव्यवस्था नाही. मग अशा राज्यात जीव धोक्यात घालून कोण येणार? मिळालेली सत्ता ही कोणा एका कुटुंबियासाठी नसून महाराष्ट्रातील 12 ते 13 कोटी जनतेसाठी आहे. मी मंत्री झाल्यानंतर राज्यात उद्योग यावेत म्हणून अनेक प्रयत्न केले. आता पत्र पाठवलं पण त्याल उत्तर नाही, असं राणे यांनी सांगितलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.