काँग्रेसच्या नाराज आमदारांचं नेतृत्व संग्राम थोपटेंकडे

काँग्रेसमधील जवळपास 20 आमदार थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार आहेत.
Sangram Thopte
Sangram ThopteSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (MahaVikas Aghadi) काँग्रेस नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात आता काँग्रेसमधील जवळपास 20 आमदार थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार आहेत. या आमदारांचं नेतृत्व भोरचे आमदार संग्राम थोपटे करत आहेत. त्यांच्याच लेटरहेडवर सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार थोपटे यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मागील अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिल्यापासून हे पदाची निवडणूक झालेली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढत चालली आहे. या पदासाठी सातत्याने संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांचे नाव पुढे आले. पण अद्याप निवडणूक होत नाही. तसेच मंत्रिपदही पदरात न पडल्यानं थोपटे नाराज असल्याची चर्चा आहे.

Sangram Thopte
आमदारांच्या घरांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

त्यातच थोपटे यांच्या लेटरहेडवर लिहिलेलं पत्र समोर आल्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हे पत्र 22 मार्च रोजीचं असून त्यात 28 आमदारांची नावं आहेत. तर 20 आमदारांच्या सह्या आहेत. हे पत्र समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. या पक्षामध्ये सोनिया गांधी यांची चार किंवा पाच एप्रिल रोजीची वेळ मागण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत माहिती देण्यासाठी आमदारांच्या शिष्टमंडळाला आपली भेट घ्यायची आहे. माझ्यासह 20 ते 25 आमदारांना भेटण्याची इच्छा असल्याचं पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

ही असू शकतात भेटीची कारणे

काँग्रेसमधील काही आमदारांनी अनेकदा महाविकास आघाडीत दुजाभाव केला जात असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडण्यासह निधी वाटपात असमानता, पक्षातील मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी, मंत्र्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळणे, अशा मुद्द्यांवरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजीची भावना असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या भेटीविषयी उत्सुकता वाढली आहे.

MLA Sangram Thopte letter
MLA Sangram Thopte letterSarkarnama

संग्राम थोपटेंनी सांगितलं भेटीचं कारण

संग्राम थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना भेटीचं कारण सांगितलं आहे. पाच आणि सहा एप्रिल रोजी नवीन आणि जुन्या आमदारांसाठी प्रशिक्षणाचे दिल्लीत आयोजन केले आहे. आम्ही दोन दिवस दिल्लीत असल्याने सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी पत्र लिहिलं आहे. दिल्लीत जाणार असल्यानं वेळ मागितली आहे. त्यात कसलीही नाराजी नाही. राज्यात काँग्रेसचे 43 आमदार असून त्यापैकी 12 मंत्री आहेत. इतर आमदारांना आम्ही भेटण्याबाबत विचारले होते. 25 ते 30 आमदारांनी तयारी दर्शवली आहे, असं थोपटे यांनी स्पष्ट केलं.

Sangram Thopte
टुक-टुक करत बसणार नाही, एकच लोहाराची मारू! आमदारांच्या नाराजीवर पटोलेंचे सूचक संकेत

आम्ही रणनीती करत आहोत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कुठलीही नाराजी नाही. आम्ही एक रणनीती करत आहोत. ईडीचा दुरूपयोग केंद्रातील भाजप सरकार करत आहे, त्याविरोधात रणनीती करत आहे. बातम्या पेरण्याचे काम सुरू आहे. एकीकडे सांगायचं शिवसेनेत नाराजी आहे, काँग्रेसमध्ये नाराजी आहे. पण भाजपमध्ये किती नाराज आहेत, हे सांगायचं नाही. भाजपमध्ये सगळं आलबेल आहे, असं नाही. आम्ही एकच लोहाराची मारू. ह्यांच्यासारखं टुक-टुक करत बसणार आहे. आमच्याकडे सगळा मसाला तयार आहे. मी कुणासारख्या पोकळ घोषणा करत नाही. जे करेन ते दणक्यातच करेन, असा सूचक इशारा पटोले यांनी भाजपला दिला. ही मोहिम भाजपविरोधातील आहे. आमदार आपली घरं भरायला आलेली नसतात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेले असतात. त्यांच्या समस्या घेऊन ते नेत्यांकडे जातात, असंही स्पष्ट करत पटोलेंनी नाराजीची चर्चा फेटाळून लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com