अजितदादा, वळसे पाटलांसमोरच रंगला कोल्हे-आढळराव यांच्यात कलगीतुरा

शिरुर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद नाही. पण, खेडमध्ये वादाच्या घटना सतत घडत असतात.
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama

घोडेगाव (जि. पुणे) : आंबेगाव पंचायत समितीच्या घोडेगाव येथे नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी आज (ता. १५ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प व पुणे-नाशिक महामार्गाचा श्रेयवाद रंगला. तसेच, शिवसेनेचे आढळराव यांनी आपण सांगितलेल्या विकासकामांना महाविकास आघाडी सरकार टोलवाटोलवी करते, असा जाहीर आरोप करून याबाबत पवार यांनी समन्वय घडवावा, अशी मागणीही केली. खासदार कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवार, वळसे पाटील यांच्यामुळे वेगाने विकास होत असल्याचे सांगितले. (Between Amol Kolhe And Shivajirao Adhalrao Patil's battle of credit)

खेड येथे पंचायत समितीच्या इमारतीच्या जागेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार आढळराव यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही. याचा भाषणात उल्लेख करुन आढळराव म्हणाले, माजी आमदार (स्व.) सुरेश गोरे यांनी प्रयत्नपूर्वक इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला. याच धावपळीत त्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. इमारतीच्या जागेवरुन राजकारण न करता पालकमंत्री म्हणून अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांनी समोरासमोर येऊन शहानिशा करावी, आमचे चुकीचे असेल तर आम्ही माघार घेऊ, अशी भूमिका मांडली. शिरुर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद नाही. पण, खेडमध्ये वादाच्या घटना सतत घडत असतात. यावरही विचार करण्याचे आवाहन त्यांनी अजित पवार यांना केले.

Ajit pawar
ठाकरेंच्या भाषणापूर्वीच रामदास कदमांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

गेली 15 वर्षे परिश्रम घेतल्यामुळेच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी 25-15 निधीतून 4 कोटी रुपये द्यावेत. त्याला वळसे पाटीलही विरोध करणार नाहीत, असे आढळराव भाषणात म्हणाले. त्यावर अजितदादांनी ‘महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आधीच्या सरकारने 25-15 निधी रद्द केला, त्यामुळे आढळराव यांचाही तो निधी रद्द झाला,’ असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे राज्यात तीन ते चार ठिकाणी असे श्रेयवादाचे राजकारण सुरु आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करु. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत आढळराव यांनी पुन्हा एकदा भाषणात केलेल्या कामाचा पाठपुराव्याची माहिती दिली. तसेच, पुणे नाशिक महामार्ग व जुन्नर येथील पर्यटनासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.

Ajit pawar
हर्षवर्धन पाटलांसारखे लोकं भाजपचे ब्रँड ॲम्बेसिडर झाले पाहिजेत

आढळराव यांनी फटकेबाजी करताच विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनीही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, पुणे-नाशिक प्रकल्पाबाबत अजित पवार यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करुन प्रकल्प लवकरच मार्गी लागेल असे सांगितले. शिरुर लोकसभा मतदार संघात 8 हजार 200 कोटींची रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच मेडीसिटी या सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलसाठी लवकरच प्रकल्प आराखडा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सादर करणार असल्याचे सांगितले . तसेच येथील 138 किलोमिटर रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गाकडे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सर्पदंश उपचार सेंटर सीएसआर फंडातून उभे करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com