
पुणे : Attack on Uday Samant गद्दरांच्या गाड्या फोडा, असा इशारा देणारे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांनी उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. सामंत यांच्यावर जिवघेणा हल्ला झालेला नव्हता. गद्दारांच्या विरोधात आलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे मत व्यक्त केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासारख्या देवमाणसाच्या पाठीत खंजीर खुपसल्याने जनतेच्या मनात चीड असल्याचे मत थोरात यांनी सामंत यांच्या हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
या हल्ल्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार का, या प्रश्नावर शिवसैनिक नेहमीच जबाबदारी घ्यायला तयार असतो, असे आक्रमक उत्तर दिले.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा भ्याड हल्ला असून या प्रकरणी पोलिस योग्य ती कारवाई करतील. मात्र चिथावणीखोर भाषणे देऊन महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिली. थोरात यांनी बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्याविषयी बोलताना गाड्या फोडण्याचा इशारा दिला होता. याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्याने शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत तुमच्याही गाड्या फुटतील, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे या हल्ल्यामुळे मी घाबरणारा नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांनीही या हल्ल्याबाबत आपल्याला माहिती नसून शिवसैनिकांना तो केला नसल्याचा दावा त्यांनी केला.
दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे थोरात यांच्या प्रतिक्रियेवर संयमी मत व्यक्त करत थोरात हे हिंगोलीमध्ये आक्रमकपणे बोलले होते. याचा अर्थ त्यांचा अशा प्रकाराला पाठिंबा आहे, असे समजू नये, असे आवाहन केले.
या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सामंत यांच्याशी संपर्क साधला. तसेच पुणे पोलिस आयुक्तांनी सामंत यांच्याशी संवाद साधला. सामंत यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन आपली तक्रार दिली. हल्ल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतल्याबद्दल त्यांनी पोलिसांना सामंत यांनी धन्यवाद दिले. मात्र या हल्ल्याबद्दल कोणालाही त्यांनी संशय व्यक्त केला नाही. पण कोणी चिथावणी दिली असेल तर त्यांना शोधून काढण्याचा इशारा दिला.
शिवसेनेचे हिंगोली संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी दिसतील तेथे गद्दारांच्या गाड्या फोडा, तुम्हाला मातोश्रीवर घेऊन जातो, असा इशारा काल हिंगोली येथे बोलताना दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उदय सामंत यांच्यावर आज पुण्यातील कात्रज हल्ला झाला. या प्रकारावरून भाजपनेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. प्रसाद लाड यांनीही या हल्ल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.
दुसरीकडे बबनराव थोरात यांनी या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यासारख्या देवमाणासाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे जनतेत असंतोष आहे. सामंत यांच्यावरील हल्ला ही जनतेतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया आलेली आहे, असा दावा केला. उदय सामंत यांच्यावरील हल्ला हा जिवघेणा नव्हता, अशीही सारवासारव त्यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.