पायाला गोळी लागलेले एसपी निंबाळकर म्हणाले, जेव्हा आयुष्य तुम्हाला बाऊन्सर टाकते...

आसाम व मिझोराम सीमेवर मागील महिन्यात झालेल्या हिंसाचारात आसाममधील काचारचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली होती.
assam police sp vaibhav nimbalkar talks about life experience
assam police sp vaibhav nimbalkar talks about life experience

मुंबई : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर मागील महिन्यात झालेल्या  हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. यात आसाममधील काचारचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर (Vaibhav Nimbalkar) यांच्या पायाला गोळी लागली होती. मूळचे इंदापूर तालुक्यातील निंबाळकर हे आता बरे होण्याचे मार्गावर आहेत. त्यांनी आयुष्यातील या वळणावरचा अनुभव मांडला आहे. 

सीमेवर झालेल्या हिंसाचारात पोलीस अधीक्षक निंबाळकर हे जखमी झाले होते. त्यांच्या पायाला गोळी लागली होती. नंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. निंबाळकर हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसरचे आहेत. पोलीस अधीक्षक निंबाळकर यांनी सोशल मीडियावर हा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आयुष्य तुम्हाला बाऊन्सर टाकते, तेव्हा तुम्ही पुन्हा उसळी घेता! मी सुखरुप असल्याबद्दल मला सर्वांचे आभार मानावेसे वाटतात. माझी तब्येत जलदपणे बरी होत आहे. या कठीण काळात मला पाठबळ देणारे श्री सद्गुरु, प्रल्हाद दादा, मित्र, सहकारी, वरिष्ठ,  हितचिंतक, जीवनविद्या या सर्वांचे मी आभार मानणार नाही तर त्यांच्या ऋणात कायम राहीन.   

माझी पत्नी अनुजा, पालक आणि कुटुंबीयांना मी मनापासून धन्यवाद देतो. संकट काळात ते खंबीरपणे माझ्यासोबत उभे राहिले. मागील महिनाभरात मला आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहता आले. एका क्षणात तुम्ही व्यवस्थित असता अन् दुसऱ्याच क्षणी गोळी तुमचा वेध घेते. एकाच मिनिटात हा सर्व मूर्खपणा थांबण्याचा विचार करू लागता. नंतर एक तासात तुमच्यापर्यंत मदत पोचले अन् एका दिवसात तुम्ही हवाई मार्गाने उपचारासाठी मुंबईत पोचलेले असता. एका आठवड्यात तुम्ही बेडवर पडून शस्त्रक्रियेची वाट पाहत असता. अखेर एक महिन्यानंतर तुम्ही पायावर चालू लागता आणि रुग्णालय सोडण्याच्या दिशेने पाऊल टाकता. एक वर्षात आयुष्य तुम्हाला कुठे घेऊन जाते हे खरेच आश्चर्यकारक आहे. 

सीमेवर झालेल्या हिंसाचारप्रकरणी मिझोरामने  आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह आसामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात केला होता. हा गुन्हा मिझोराममधील कोलासिब जिल्ह्यातील वैरेंग्टे पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर हा गुन्हा मागे घेण्यात आला. यात आसामचे पोलीस महनिरीक्षक अनुराग अग्रवाल, उपमहानिरीक्षक देवज्योती मुखर्जी, काचारचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर आणि धौलाई पोलीस ठाण्याचे प्रभारी साहब उद्दीन यांचा यात समावेश होता. 

आसाम -मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे  देशभरात खळबळ उडाली होती. आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com