नसरापूर (जि. पुणे) : राजगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात काँग्रेसचे (congress) भोरचे आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे (sangram Thopte) यांना अद्याप यश येऊ शकले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (आज, ता. २९ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (ncp) १३, तर भारतीय जनता पक्षाच्या (bjp) वतीने ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेसकडून गेल्या दोन दिवसांत अर्ज दाखल केले आहेत, एकूण दाखल अर्जांची संख्या ४५ इतकी झाली आहे. आमदार थोपटेंच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना (shivsena) आणि भाजप एकत्र आले असून एकास एक लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाआघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. (All-party panel against Sangram Thopat in Rajgad Sugar factory election)
राजगड साखर कारखान्याच्या १७ संचालकांच्या निवडीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी माजी संचालक चंद्रकांत सागळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ता. २७ एप्रिल रोजी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, आमदार संग्राम थोपटे यांच्या दोन अर्जांसह उत्तम थोपटे, पोपटराव सुके, सोमनाथ वचकल (दोन अर्ज), दत्तात्रेय चव्हाण, किसनराव सोनवणे, शैलेश सोनवणे, विकास कोंडे, किसन शिनगारे, सुरेखा निगडे, शोभा जाधव आदींचे अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. २८ एप्रिल) ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्यासह किसन शिनगारे, सोमनाथ वचकल, शिवाजीराव कोंडे, दिलीप कोंडे, दिनकर धरपाळे, संभाजी मांगडे, प्रताप शिळीमकर, संदीप नगिने (दोन अर्ज), अशोक शेलार, असे १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या आजच्या (ता. २९ एप्रिल) शेवटच्या दिवशी ‘राजगड’साठी विरोधकांनी कंबर कसल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने रामचंद्र कुडले, शिवाजी बांदल, संजय भिलारे, पंडीत बाठे, ज्ञानेश्वर बागल, सुरेश खुटवड, दिलीप रेणुसे, रामदास गायकवाड, मनोज निगडे, राजेश गायकवाड, राजाराम कांबळे, राजेश राऊत व अलका मालुसरे असे १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपच्या वतीने दत्तात्रेय पांगारे, विलास अमृत बांदल व बाळासाहेब गरुड या तिघांचे अर्ज दाखल झाले आहेत. इतरांमध्ये विठ्ठल कुडले, सुभाष कोंढाळकर, दत्तात्रेय भिलारे, सुधीर खोपडे यांनीही आज अर्ज दाखल केले. छाननीमध्ये हे सर्वच अर्ज वैध ठरले, तर थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पॅनेल विरोधात काँग्रेस विरोधी पक्षीय पॅनेल यांच्यात एकास एक लढत होण्याची चिन्हे आहेत.
याबाबत शिवसेनेचे कुलदीप कोंडे म्हणाले की, माझ्या आईच्या निधनामुळे मी काही दिवस सक्रीय नव्हतो; तरीही आज शेवटच्या दिवशी काही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. परंतु कागदपत्रे अपूर्ण असल्याने निवडणुकीस उमेदवारीसाठीचा पात्र दाखला मिळू शकला नाही. शिवसेनेचे उमेदवार नसले तरी काँग्रेसच्या विरोधातील पॅनेलला आम्ही सहकार्य करणार आहोत.
राजगड कारखान्यात शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होते. राजकारण केले जाते, हे योग्य नाही. हा कारखाना चांगला चालावा. शेतकऱ्यांना त्याचा लाभा व्हावा, यासाठी पक्षीय पातळीवर राजकारण न करता राजगड कारखान्याची निवडणूक लढवण्याची आमची भूमिका आहे. इतर समविचारी उमेदवारांना निवडणुकीत बरोबर घेणार आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित शिवतरे यांनी स्पष्ट केले.
भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, अशोक पांगारे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही निवडणूक लढविण्याच्या भूमिकेत आहोत. काँग्रेसच्या विरोधात लढताना इतर पक्षांना बरोबर घेताना सामंजस्याची भूमिका घेत आम्ही तीन जागा लढवत आहोत.
या सर्वपक्षीय अर्ज सादर करण्याच्या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, वेल्ह्याचे संतोष रेणुसे, रणजित,शिवतरे, विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप,चंद्रकातं बाठे, मानसिंग धुमाळ, गणेश खुटवड, रवींद्र बांदल, शिवसेनेचे कुलदीप कोंडे, अमोल पांगारे, आप्पा सोनवले, अमित गाडे,शांताराम जायगुडे, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, बाळासाहेब गरुड, अशोक पांगारे आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.