पुणे ही देशातील स्टार्टअप्सची राजधानी होणार - देवेंद्र फडणवीस

phadavnis
phadavnis

ठाणे : " देशातील ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षाखालील असून ही तरुण पिढी तंत्रज्ञानात प्रगत आहे तसेच त्यांना नवीन उपक्रम सुरु करण्याची उर्मी आहे. त्यांना आता नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बनायचे आहे त्यामुळे पुढील काळात स्टार्ट अप्सना उत्तेजन दिले जाईल .   पुणे ही देशातील स्टार्ट अप्सची राजधानी होईल. "

" स्टार्टअप्स कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून टाटा सारख्या नामांकित आणि विश्वासार्ह कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात स्टार्ट अप्ससाठी पोषक वातावरण तयार करण्यात येईल ," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या भारतातील सर्वात मोठ्या अशा टीसीएस ऑलम्पस सेंटर या भव्य कॅम्पसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हिरानंदानी इस्टेट येथे पार पडले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

१९ लाख स्क्वेअर फूट जागेत विस्तारलेल्या या कार्यालयासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गेल्या वर्षी हिरानंदानी यांच्याशी करार केला होता. याठिकाणी एकाचवेळी ३० हजार कर्मचारी काम करू शकतील अशी व्यवस्था आहे. टीसीएस आणि हिरानंदानी यांच्यात या जागेसाठी १५ वर्षांचा करार करण्यात आला आहे.

 आपण केवळ चीनमध्ये अतिशय कमी कालावधीत मोठेमोठे प्रकल्प बांधून पूर्ण झाले असे पाहतो पण हा टीसीएसचा अवाढव्य प्रकल्प केवळ १८ महिन्यात उभारला त्याचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.

लवकरच राज्याचे फिनटेक धोरण ठरविण्यात टाटा सन्ससारख्या सक्षम कंपन्यांची मदत घेतली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. टाटा समूह नाशिक येथे सामाजिक जबाबदारीतून करीत असलेल्या उपक्रमांचीही मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. 

मुख्यमंत्री म्हणाले , "  टीसीएस आणि टाटा या डिजिटल युगात काय उपक्रम राबवित आहेत आणि देशाला त्याचा काय फायदा होतो आहे हे टीकाकारांनी प्रत्यक्ष पाहून समजावून घ्यावे. "

" देशातील अद्ययावत अशा ठाणे येथील कॅम्पसमुळे ३० हजार जणांना रोजगार मिळणार आहे .  यानंतर नागपूर येथील कंपनीच्या प्रकल्पातही १० हजार तंत्रज्ञांना रोजगार मिळणार आहे तसेच पुणे येथील प्रकल्पामुळे तर महाराष्ट्राची मान डिजिटल क्षेत्रात अधिक उंचावेल." 

टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन , मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनीदेखील मनोगत व्यक्त केले
 

प्रारंभी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नामफलकाचे अनावरण तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, कपिल पाटील, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, गणपत गायकवाड, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह, निरंजन हिरानंदानी आदी  उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com