अमरावती : 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये महाराष्ट्रात भ्रष्टाचार तीन टक्क्यांनी कमी झाल्याचे समाधान आहे. परंतु क्रमवारीचा विचार केल्यास राज्यामध्ये पुणे परिक्षेत्रातच सर्वाधिक लाचखोर वर्षभरात पकडले गेले. महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कामकाज ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड आणि मुंबई या परिक्षेत्राअंतर्गत 35 जिल्ह्यांत चालते.
गत वर्षात राज्यामध्ये 858 ठिकाणी या विभागाने सापळे रचले असून, अपसंपदेची 19 प्रकरणे आणि अन्य मार्गाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या पाच प्रकरणांचा समावेश आहे. 2018 मध्ये 884 सापळे, 22 अपसंपदेचे गुन्हे आणि अन्य मार्गाने केलेल्या भ्रष्टाचाराची 23 प्रकरणे उघडकीस आली. यावर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 26 गुन्हे कमी दाखल झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जारी केलेल्या अहवालात संपूर्ण राज्याचा विचार केल्यास लाचप्रकरण, अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे तीन टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येते. पुणे परिक्षेत्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 181 सापळे या विभागाने यशस्वी केले. तर तीन अपसंपदेच्या गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. त्यातही लाचखोरांविरुद्ध सर्वाधिक 64 ट्रॅप हे पुणे जिल्ह्यातील आहेत.
राज्यामध्ये अपसंपदा बाळगल्याप्रकरणी सर्वाधिक पाच गुन्हे ठाणे परिक्षेत्रात दाखल असून, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावतीमध्ये प्रत्येकी तीन, तर मुंबईमध्ये दोन प्रकरणे 2019 मध्ये उघडकीस आली. औरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्रात अपसंपदेच्या एकाही गुन्ह्याची नोंद नाही.
पुणे : 181
ठाणे : 97
नाशिक : 123
नागपूर : 111
अमरावती : 103
औरंगाबाद : 124
नांदेड : 79
मुंबई : 40
एकूण : 858
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.