महाभरतीसाठी आता खासगी एजन्सी; महाआयटीकडे राहणार नियंत्रणाची जबाबदारी

शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांमुळे कामकाजात येणारे अडथळे, वाढलेल्या सुशिक्षित बेरोजगारीच्या पार्श्‍वभूमीवर महाभरतीसाठी आता सक्षम अशी खासगी एजन्सी नियुक्‍तकेली जाणार आहे
Private Agency will be Appointed for Maharashtra Mega Employment
Private Agency will be Appointed for Maharashtra Mega Employment

सोलापूर : शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांमुळे कामकाजात येणारे अडथळे, वाढलेल्या सुशिक्षित बेरोजगारीच्या पार्श्‍वभूमीवर महाभरतीसाठी आता सक्षम अशी खासगी एजन्सी नियुक्‍त केली जाणार आहे. दरम्यान, आगामी महाभरतीचे नियोजन कसे राहणार, खासगी एजन्सीची नियुक्‍ती कशी करायची, याबाबत पुढील आठवड्यात शासन स्तरावरुन सुस्पष्ट परिपत्रक काढले जाणार आहे. महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांच्या माहितीचे हस्तांतरण केले जाणार असून या प्रक्रियेसाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याने महाभरती एप्रिलपासून सुरु होणार आहे.

महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेवून लोकप्रतिनिधींनीही पोर्टल बंदची मागणी लावून धरली. त्यानुसार ठाकरे सरकारने पोर्टल बंद केले, मात्र महाभरती कशी राबवायची, असा प्रश्‍न नव्याने उपस्थित झाला. त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता. २१) महाआयटीच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आगामी महाभरती प्रक्रिया कशाप्रकारे राबवायची, याबाबत सुस्पष्ट निर्देश काही दिवसांत राज्य सरकार देणार असून त्यानुसार महाडीबीटीने नियोजन करावे, अशा सूचना सचिवांनी दिल्या.

महाभरतीसाठी नियुक्‍त एजन्सीची क्षमता व तांत्रिक पडताळणीचे काम महाआयटीकडे राहणार आहे. तत्पूर्वी, महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांचा डाटा महाडीबीटीला हस्तांतरीत केला जाणार असून नियुक्‍त एजन्सीमार्फत राबविल्या जाणाऱ्या परीक्षा व निकालावर महाडीबीटीचे नियंत्रण राहणार आहे. या प्रक्रियेसाठी दिड महिन्यांचा अवधी लागणार असल्याने एप्रिलपासून महाभरतीला सुरवात होईल, अशी शक्‍यताही महाडीबीटीने व्यक्‍त केली.

मेगाभरतीचे आगामी नियोजन
- रिक्‍त पदांच्या भरतीच्या नियोजनाबाबत लवकरच सुस्पष्ट शासन निर्णय
- महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांची नोंदणी व अन्य माहिती महाआयटीकडे हस्तांतरीत
- निवीदेच्या माध्यमातून खासगी एजन्सीचे मागविणार प्रस्ताव : त्यांची होणार तांत्रिक व क्षमता पडताळणी
- अर्ज मागविणे, परीक्षा घेणे व निकाल लावण्यापर्यंतची जबाबदारी महाडीबीटीकडे राहणार
- सर्व प्रक्रिया दीड महिन्यांत पूर्ण करुन महाभरतीला प्रारंभ करण्याचे सचिवांनी दिले निर्देश

राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापरीक्षा पोर्टल बंद झाल्याने आता पोर्टलकडील डाटा महाआयटी व जेईडीकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील रिक्‍त पदांच्या भरतीसाठी खासगी एजन्सीचे निवीदेद्वारे प्रस्ताव मागवून त्यापैकी एक सक्षम एजन्सीची निवडली जाणार आहे. भरती प्रक्रियेची रुपरेषा ठरविणे व एजन्सी नियुक्‍तीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी महाआयटीकडे सोपविण्यात आली आहे.
- अजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाआयटी, मुंबई
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com