जिल्हा बॅंकेची निवडणूक अजितदादा पुढे ढकलणार का?

....
जिल्हा बॅंकेची निवडणूक अजितदादा पुढे ढकलणार का?

चोपडा ः जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायट्यांच्या ठरावासाठी घोडेबाजार होणार असल्याची बातमी आज ‘सकाळ'ने प्रकाशित केली आहे. याची दखल घेत सभासदांनी केलेले ठराव येणाऱ्या काळात रद्द होण्याची शक्यता असून, ही निवडणूक तूर्त रद्द करून पुढे ढकलावी, अशी मागणी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.

जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांकडून ठराव मागविण्यात येत असून, अनेक ठिकाणी घोडेबाजार होत असल्याने सभासदांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ८७६ सोसायट्यांपैकी फक्त दहा सोसायट्यांमधून संचालक मंडळातून एका संचालकांचा ठराव होणार आहे. उर्वरित सोसायट्यांमध्ये नियमित कर्जफेड करणारा सभासदाचा ठराव होणार आहे. सभासदांमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याने संचालक मंडळातून ठराव होत नसल्याने घोडेबाजार होत आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुढे ढकलली गेली तर बरे होईल. कर्जमाफी प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास सोसायट्यांची तात्काळ वसुली होईल. ही वसुली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अडचणी आहेत. याबाबत आपण पत्र दिले असून अनेक सोसायटी किंवा सभासदांनी केलेले ठराव येणाऱ्या काळात रद्द होण्याची शक्यता आहे. बँकेची निवडणूक पुढे ढकलली गेली तर याचाही फायदा होणार आहे, अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  रवींद्र पाटील यांनीही दखल घेतली असून, जिल्ह्यातील बऱ्याच विविध कार्यकारी संस्था थकीत कर्जामुळे 'क' व 'ड' वर्गात गेलेल्या आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर बहुतेक संस्था ह्या 'अ' व 'ब' वर्गामध्ये येतील. त्यामुळे त्यांना त्या बँकेच्या मतदानास पात्र होतील याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी, त्यातील त्रुटी दूर कराव्यात, कर्जमाफी संदर्भात २०१५ च्या आधी काही शेतकरी सुटले आहेत. त्यांनाही समाविष्ट करावे, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निर्णय घेण्यासाठी लवकरच भेट घेणार असून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना या माहितीचा पत्र्यव्यवहार केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

कर्जमाफीबाबत निर्णय झाला असून लवकर रक्कम टाकल्यास अनेक संस्था बँकेच्या मतदान प्रक्रियेत येतील. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आनंद होईल. ‘सकाळ'ने दिलेले वृत्त योग्य असून हा सोसायटीच्या ठराव करताना होणारा घोडेबाजार कुठेतरी थांबविण्यात यावा. ही लोकशाहीची चेष्टा आहे, असे मत जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा इंदिराताई पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com